Dharmarao Baba Atram Sarkarnama
विदर्भ

Gondia Dharmarao Baba News : गाळेधारक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन; पालकमंत्री धर्मरावबाबा कशी घालणार सांगड?

अभिजीत घोरमारे

Gondia City Political News : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा पालक जिल्हा गोंदियात नगर परिषद एका मोठ्या पेचात सापडली आहे. गोंदिया नगर परिषदेत मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात थकले आहेत. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. (There is a delay in paying the salary to the city council employees in Gondia)

पालिकेच्या शहरातील दुकान गाळ्यांचे भाडेदेखील थकलेले आहे. त्यामुळे पालिकेला दैनंदिन खर्च भागविणेदेखील कठीण झाले आहे. उत्पन्न येत नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासदेखील विलंब होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत असंतोष पसरत आहे. गोंदिया शहरातील बाजार परिसर, स्टेडियम, गोशाला वॉर्ड आणि इतर ठिकाणी पालिकेने आपल्या मालकीच्या जागेवर दुकान गाळे तयार केले. ते

गाळे भाडे तत्त्वावर व्यापाराकरिता देण्यात आले. दुकान गाळ्यांच्या माध्यमातून पालिकेला नियमित उत्पन्न मिळावे, अशी अपेक्षा होती. मात्र, पालिका वारंवार भाड्याची मागणी करत असतानादेखील दुकानदार भाडे नियमित भरत नाही. परिणामी गेल्या कित्येक वर्षांपासून पालिकेला भाडे मिळत नसल्याने आजघडीला थकबाकी एक कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

आता उत्पन्न येत नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासदेखील नाइलाजास्तव विलंब होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांत धुसफूस सुरू झाली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर यंदा येणारी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, कर्मचाऱ्यांत निर्माण झालेला असंतोष लक्षात घेता मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे.

भाडे वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. जे दुकानदार भाडे देण्यास टाळाटाळ किंवा अडथळा निर्माण करणार, अशा सर्व दुकानांना नगर परिषद कायद्यांतर्गत पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने सील ठोकण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासन व दुकानदार आमने सामने येणार, हे निश्‍चित आहे. दरम्यान, पालकमंत्री महोदयांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

नगरपालिकेत अशी स्थिती उद्भवल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांसह स्थानिक पुढाऱ्यांमध्येही चिंता आहे. यामध्ये नव्यानेच पदभार स्वीकारलेले पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. स्थानिक पुढारी, मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विश्‍वासात घेऊन नगरपालिकेला ही मोहीम राबवावी लागणार आहे. तेव्हाच कुठे या अडचणीतून मार्ग काढता येणे शक्य होणार आहे. पालकमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवण्यात आला आहे. ते या प्रकरणात काय निर्णय घेतात आणि तोडगा कसा काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT