Sandipan Bhumare
Sandipan Bhumare Sarkarnama
विदर्भ

पालकमंत्री संदीपान भुमरे औरंगाबादेतून हाकताहेत यवतमाळ जिल्ह्याचा गाडा…

सरकारनामा ब्यूरो

यवतमाळ : राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाल्यानंतर काहीच दिवसांत यवतमाळ जिल्हा चर्चेत आला. कारण वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचे आमदार, राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांची यवतमाळचे पालकमंत्री (Guardian Minister) म्हणून नियुक्ती केली. पण या जिल्ह्यात त्यांनी आजतागायत रस दाखवला नाही. आता तर ते चक्क औरंगाबादेत बसून यवतमाळ जिल्ह्याचा गाडा हाकण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे अधिकाऱ्यांत मात्र रोष बघायला मिळत आहे.

केवळ सोईनेच फक्त बैठकांपुरता वेळ देणाऱ्या पालकमंत्री भुमरे (Sandipan Bhumare) यांना यवतमाळचा (Yavatmal) विसर पडत चाललाय, अशी ओरड होत आहे. आज आणि उद्या तर पालकमंत्र्यांनी प्रशासकीय बैठकांचे आयोजन थेट औरंगाबाद येथे केले असून यवतमाळ ते औरंगाबाद अशी ससेहोलपट अधिकारी वर्गाला करावी लागणार आहे. आज १० आणि उद्या १० अधिकाऱ्यांना त्यांनी औरंगाबादला बोलावले आहे. पालकमंत्री भुमरे यांच्या या उरफाट्या कारभारामुळे जिल्ह्यातील कामकाज प्रभावित होणार आहे. पालकमंत्री भुमरे यांनी औरंगाबाद येथे उद्या, शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीबद्दल प्रशासनातून दबक्या आवाजात कुरबुरी ऐकायला मिळत आहेत. पालकमंत्री भुमरे यांच्याकडे रोजगार हमी हे खाते असून मनरेगामध्ये रोज नवीन नवीन घोटाळे उघडकीस येत असताना आता पालकमंत्री थेट औरंगाबादवरून कारभार करत असल्याने जिल्ह्यातील नागरिक चीड व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यातील विविध विकासात्मक कामांचा आढावा पालकमंत्री संदीपान भुमरे चक्क औरंगाबाद येथे घेणार आहेत. शुक्रवारी, औरंगाबाद येथे होणाऱ्या बैठकीत महसूल, जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी माहिती गोळा करण्याची लगबग सुरू केली. एका दिवसाच्या बैठकीमुळे जिल्ह्यातील शुक्रवारचे कामकाज पूर्णतः: ठप्प पडणार आहे.

पालकमंत्र्यांची वर्षपूर्ती..

जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तद्ननंतर जवळपास दीड महिना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, १६ एप्रिल २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार तथा राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार सोपवण्यात आला. तद्ननंतर पालकमंत्र्यांनी आवश्यकतेनुसार जिल्ह्यात आढावा बैठका घेऊन काही अंशी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

आर्थिक वर्ष संपुष्टात आले असून, पालकमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळाचीसुद्धा वर्षपूर्ती झाली आहे. अशा परिस्थितीत वर्षभरातील विकासात्मक कामे, त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येणाऱ्या निधीतील कामांचा आढावा पालकमंत्री म्हणून त्यांनी घेणे क्रमप्राप्त आहे. त्या अनुषंगाने आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे, या बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील संपूर्ण अधिकाऱ्यांना औरंगाबाद येथे बोलावण्यात आले आहे. परंतु या आढावा बैठकीमुळे अधिकाऱ्यांमध्ये कमालीचा रोष व्यक्त केला जात आहे.

औरंगाबाद बैठकी वर काही प्रश्न..

जिल्ह्याचे पालकमंत्री पद नकोसे झाले काय? औरंगाबाद येथे आढावा घेण्याचे औचित्य काय? ऑनलाइन आढावा घेता येत नव्हता का? जिल्ह्याचे अंतर लांब पडते म्हणून निर्णय घेतला का? स्वीय साहाय्यकांवर जिल्ह्याची जबाबदारी दिली का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT