Ravikant and Geetabai Tupkar
Ravikant and Geetabai Tupkar Sarkarnama
विदर्भ

माझ्या लेकराला काही झाले तर, जगातील कोणतीही आई सरकारला सोडणार नाही...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी १७ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. दरम्यान ‘माझा पोरगा गुंडा नाही, तो शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतो आहे. त्याच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास, सरकार जबाबदार राहील, असे रविकांत यांची आई गीताबाई चंद्रदास तुपकर यांनी म्हटले आहे.

विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा, यासाठी माझा पोरगा लढत आहे. तो कुणी डाकू नाही, गुंडगिरी करत नाही, शेतमालाला भाव मिळावा, यासाठी ३ दिवस झाले त्याने अन्नाचा कण देखील खाल्लेला नाही. आज त्याची तब्येत फार खराब झाली. तो अदानी, अंबानी नाही, कष्टाने कमावलेल्या मालाला भाव मागतोय. त्याच्या आईवडिलांच्या आणि सर्व शेतकऱ्यांच्या घामाला भाव मागतोय. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला आहे, असे गीताबाई तुपकर म्हणाल्या.

सरकारने त्याचा दखल घेतली पाहिजे. त्याच्या जिवाचे काही कमीजास्त झाले तर त्याला सरकार जबाबदार असेल. माझ्या लेकरानं ३ दिवसांपासून काही खाल्लेलं नाही. माझ्या पोटात आतडे तोडताहेत, हे सांगताना गीताबाई यांना हुंदके आवरणे अवघड झाले आहेत. एका आईचं मन तीळतीळ तुटत असताना या सरकारला दया कशी येत नाही, असा प्रश्‍न त्यांना आसवांच्या पावसात विचारला आहे. त्याच्या जिवाला काही झाले तर मी काय, या जगातील कोणतीही आई या सरकारला माफ करणार नाही, असेही गीताबाई म्हणाल्या.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 17 नोव्हेंबरला नागपूर येथे संविधान चौकात अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. दरम्यान रात्री 11.30 वाजता पोलिसांनी जबरदस्तीने तुपकर व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना पोलिस बंदोबस्तात बुलडाणा येथे सोडण्यात आले. परंतु, तुपकरांनी आपले आंदोलन मागे न घेता ते सुरूच ठेवले. काल गुरुवारी (ता. १८) पहाटे 6 वाजता बुलडाण्यात पोचल्यावर त्यांना निवासस्थानासमोर ते सत्याग्रहास बसले.

दरम्यान आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली यामध्ये त्यांची शुगर वजन कमी झाली असून रक्तदाब वाढला आहे. बोलण्यासाठी सुद्धा त्रास होऊ लागला आहे. डॉ. प्रवीण पिंपरकर यांनी त्यांच्या विविध तपासण्या केल्या. मात्र दुसरीकडे शासकीय यंत्रणा त्यांच्या आंदोलना दरम्यान प्रकृतीची कोणतीही काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेविरोधात रोष व्यक्त होत आहे. याशिवाय या आंदोलनाचा पुढील टप्पा चक्काजाम किंवा इतर मोठे आंदोलन होऊ शकते, असे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT