Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

शेतकऱ्यांना आत्महत्येच्या वाटेवर नेल्यास आंदोलनाच्या सर्व परिसीमा ओलांडू…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : शेतकऱ्यांची संयम ठेवण्याची सीमा संपली आहे. त्यांनी तरी किती संयम ठेवायचा, आणखी किती सहन करायचे? केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ घालायचा, तो घालावा. पण येत्या दोन-तीन दिवसांत ओल्या दुष्काळाची घोषणा करावी आणि शेतकऱ्यांना विनाअट मदत करावी. नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. यावेळी आम्ही आंदोलनाच्या सर्व परिसीमा ओलांडणार आणि त्याचे परिणाम राज्य आणि केंद्र सरकारला भोगावे लागतील, असा सज्जड दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

१६ आणि १७ तारखेला जी अतिवृष्टी झाली, त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील राहिलेसुरले सर्व पीक उद्धवस्त झाले. शेतांमधील कापूस गेला, सोयाबीन गेले आणि शेतांमध्ये नद्या, नाले तयार झाले. शेतकरी ढसाढसा रडतो आहे, तरी राज्यकर्ते त्याच्याकडे बघायला तयार नाहीत. राज्य सरकारने घोषित केलेली मदत अत्यंत तोकडी आहे आणि अद्याप ती मिळालीसुद्धा नाही. याआधीही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि आताही अतिवृष्टी झाली. राज्य सरकार असो की केंद्र सरकार दोघांनाही शेतकऱ्यांना मदत दिल्याशिवाय पळ काढता येणार नाही, असे रविकांत तुपकर म्हणाले.

केंद्राने मन मोठे करावे, राज्याने पुन्हा एकदा मोठे मन करावे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. केंद्रीय मंत्री असो वा राज्यातील मंत्री यांना आता पळ काढता येणार नाही. त्यामुळे त्यांना आता पळवाटा शोधणे बंद करावे. सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे आणि कुठल्याही अटी, शर्ती न लावता तात्काळ शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तिजोरीत पैसा नाही, ही सबब सांगणे आता बंद केले पाहिजे. कारण या जबाबदारीतून सरकारला हात झटकता येणार नाही. शेतकरी तुमच्याकडे आशेने बघतो आहे. त्यांनातरी मायबाप सरकारशिवाय कोण वाली आहे, असा प्रश्‍न तुपकर यांनी उपस्थित केला.

मदत तोकडी, हे सरकारलाही कबूल..

अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलेली मदत ही अत्यंत तोकडी आहे, ही बाब सरकारलाही कबूल आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गेल्या आठवड्यात तशी कबुली दिली. हे सर्व जर माहिती आहे, तर मदत वाढवून देण्यासाठी कोणते प्रयत्न केले, असा सवाल तुपकरांनी विचारला. त्यांनी सांगितले की, सरकारचे आर्थिक स्त्रोत वाढल्यावर आम्ही पुन्हा मदत देऊ. तर मग आत्ता का नाही वाढविले जात स्त्रोत? त्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्याच झाल्या पाहिजेत का? विष पिऊन, फासावर लटकून शेतकरी मेल्यावर तर करताच ना मदत… मग आत्ता जिवंतपणी तो आस लावून बसला असताना मदतीसाठी तुमचे हात का पुढे येत नाही, असा संतप्त सवाल रविकांत तुपकर यांनी सरकारला विचारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT