Bacchu Kadu
Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu : आमच्या सेवाकार्याला नावे ठेवाल, तर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही !

Atul Mehere

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार आणि अचलपूरचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील वादावर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendfa Fadanvis) यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला. रवी राणा यांनी माफी मागून वादावर पडदा टाकला. पण बच्चू कडूंनी मात्र आपली आक्रमकता सोडली नाही. यापुढे आमच्या वाट्याला जाल आणि आमच्या सेवाकार्याला नावे ठेवाल, तर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

काल अमरावती (Amravati) येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना बच्चू कडू (Baccu Kadu) म्हणाले, रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मागितलेल्या माफीचा आम्ही स्वीकार करतो, मात्र यापुढे जर कुणीही आमच्या वाट्याला गेले तर त्यांच्याशी दोन हात करू, असा इशारा त्यांनी अमरावतीत आयोजित कार्यकर्त्यांच्या सभेत दिला. त्यांनी माफी मागून एक पाऊल मागे घेतल्याने आम्हीसुद्धा चार पावले माघार घेऊ. त्यामुळे आता तो विषय येथेच संपल्याचे आमदार बच्चू कडू यांनी या जाहीर सभेत स्पष्ट केले.

मागील काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात वाकयुद्ध चांगलेच रंगले होते. त्याची झळ राज्यातील सत्तेपर्यंत पोहोचली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांमध्ये दिलजमाई घडवून आणल्यानंतर अमरावतीच्या जाहीर सभेत बच्चू कडू काय भूमिका घेणार, याची उत्सुकता ताणल्या गेली होती. मात्र हा विषय येथेच संपल्याचे जाहीर करून बच्चू कडू यांनी वादावर अखेर पडदा टाकला. बच्चू कडू म्हणाले, प्रहार ही संघटना कार्यकर्त्यांच्या घामातून आणि रक्तातून तावून सुलाखून निघालेली आहे. त्यामुळे कुणी जर आमच्या सेवाकार्याला नावे ठेवत असतील तर त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारासुद्धा त्यांनी दिला. अमरावतीच्या कार्यकर्ता मेळाव्याला राज्यातील विविध जिल्ह्यांतून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमची बंडखोरी नव्हे, तर तो उठाव..

राज्यमंत्रिपद असतानासुद्धा आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलो. सत्तापालट झाल्यानंतर सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांच्या सेवेसाठी व्हावा, यासाठी आम्ही केलेला हा उठाव होता. ती बंडखोरी नव्हती, असेही बच्चू कडू म्हणाले.

पुढील खासदार प्रहारचाच..

अमरावती जिल्ह्याचा खासदार म्हणून निवडून येण्यासाठी अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघाचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळातील खासदार हा प्रहारचाच राहील, असे आमचे प्रयत्न राहतील, असे प्रहारचे आमदार राजकुमार पटेल या सभेत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT