Nursing Students in Bhandara. Sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter Session : अचानक अस्वस्थ झालेल्या विद्यार्थिनींचा मुद्दा सभागृहात गाजणार

अभिजीत घोरमारे

Bhandara News : शासकीय परिचारिका वसतिगृहातील 40 विद्यार्थिनींना अन्नातून झालेल्या कथित विषबाधेचा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत. भंडारा येथे हा प्रकार घडला होता. भंडाऱ्यातील या प्रकारासोबतच राज्यातील आरोग्य यंत्रणेवरही सभागृहात वादळी चर्चा होण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.

भंडारा येथील रुग्णालयात 2021 मध्ये मोठी आग लागली होती. त्यात नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील दहा बालकांचा होरपळल्यानं मृत्यू झाला होता. संपूर्ण राज्यात हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. आता शासकीय परिचारिका वसतिगृहात झालेल्या विषबाधेच्या प्रकारामुळं पुन्हा एकदा भंडारा जिल्हा चर्चेत आला आहे.

वसतिगृहातील 40 विद्यार्थिनींना एकाच वेळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दाखल करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थिनी जीएनएम व एएनएमच्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यापैकी अनेकांना सुटी देण्यात आलीय. एकाचवेळी 40 विद्यार्थिनी आजारी पडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने सर्व विद्यार्थिनींच्या विविध तपासण्या केल्या. त्यात निगेटिव्ह अहवाल आलेल्या विद्यार्थिनींना सुटी देण्यात आली.

विषबाधेची शक्यता असल्याने त्या दृष्टीने तपासण्या करण्यात आल्या. अन्न व औषध प्रशासन विभागालाही पाचारण करण्यात आले. हा प्रकार विषबाधेचा नसून व्हायरल असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. दीपचंद सोयाम यांनी सांगितले. अशात एकाच वेळी सर्व 40 विद्यार्थिनींना व्हायरलची लागण कशी होऊ शकते, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने अद्यापही यासंदर्भात मौन भूमिका घेतलीय. त्यामुळं प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. अशातच नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी धास्तावले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नर्सिंगच्या विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याच्या निमित्तानं भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयाला लागलेल्या आगीवर पुन्हा सभागृहात चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अलीकडेच राज्यातील काही रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमावर रुग्ण दगावले. औषधांच्या तुटवड्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. शासनाला यासंदर्भात खुलासाही करावा लागला होता. राज्यातील अनेक शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था अद्यापही दयनीय आहे. अनेक इस्पितळांच्या इमारती तयार आहेत. परंतु तेथे मनुष्यबळ नसल्यानं अद्यापही रुग्णसेवा सुरू झालेली नाही. मनुष्यबळाचा अभाव, हाफनिकला दिलेले औषधी खरेदीचे अधिकारी, खाटांचा तुटवडा आणि खासकीय वैद्यकीय वसतिगृहांची अवस्था आदी सर्व विषयांवर विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चेची मागणी होणार आहे. शासन यासंदर्भात काय भूमिका घेते याकडं सर्वांचं लक्ष आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT