Vijay Wadettiwar and Chhagan Bhujbal Sarkarnama
विदर्भ

Jalna Maratha Protest : छगन भुजबळांचा हवाला देत वडेट्टीवारांचा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न !

Wadettiwar on Chhagan Bhujbal : भुजबळ स्वतः बोलले होते की आरक्षण वाढवून दिल्यास माझी अडचण नाही.

Atul Mehere

Nagpur Political News : ओबीसीचे ५२ टक्के लोक आहेत आणि २८ टक्के आरक्षण आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर वाढवून द्या आणि खुशाल घ्या आरक्षण, ही आमची भूमिका होती. आमच्या या भूमिकेवर छगन भुजबळ यांनी स्वतः फोन केला होता. भुजबळ स्वतः बोलले होते की आरक्षण वाढवून दिल्यास माझी अडचण नाही. मग आता द्या वाढवून आरक्षणाची टक्केवारी, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. (Vadettivar's attempt to catch the government in a quandary)

नागपुरात आज (ता. ५) सकाळी वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमची भूमिका मध्यस्थीची होती. मराठा समाजाला आरक्षण देतेवेळी ओबीसींचे नुकसान होऊ नये, असा आमचा प्रयत्न होता. या गोष्टीला माझं समर्थन आहे. कुठेही शब्दांची फिरवाफिरवी नाही. आरक्षण वाढवून दिले गेले नाही, तर आम्ही ओबीसींच्या आरक्षणातून ते देऊ देणार नाही ही आमची भूमिका आजही कायम आहे.

३० दिवस नव्हे, तर ३० महिने घेतले तरी हे सरकार आरक्षण देऊ शकत नाही. मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. पार्लमेंटमध्ये ईडब्यूएसच्या धर्तीवर आरक्षण वाढविल्याशिवाय आणि त्याचे नोटिफिकेशन किंवा गॅझेट केल्याशिवाय होऊ शकत नाही. हे काम केंद्र सरकारचे आहे.

सरकारची खरच भूमिका असेल तर विशेष अधिवेशन एक दिवस वाढवून आरक्षणात वाढ करावी आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं तर हा मार्गच या महिन्यात सुटू शकतो. पण सरकारला ते करायचं नसेल तर विनाकारण बनवाबनवी करू नये, असे वडेट्टीवार म्हणाले.

प्रकाश आंबेडकर काय बोलले, हे मी ऐकलं नाही. मात्र मंदिराबद्दल हिंदूंच्या मनात आस्था आहे आणि लष्कराच्या ताब्यात देण्यापेक्षा मंदिराचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. याचे राजकारण होता कामा नये. याचा मतांसाठी वापर करता कामा नये, असे ते म्हणाले.

यासंदर्भात आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, सन २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निकाल लागला. गायकवाड समितीचा अहवाल, ते टिकवला म्हणतात, पण मला माहीत आहे की, तो कसा टिकवला. ज्या मोरे न्यायाधीशांनी निकाल दिला त्यांना पदावनत करण्यात आलं.

बच्चू कडू आमच्यासोबत राहतील..

या विषयात मी अधिक बोललो तर वेगळ्या दिशेने विषय जाईल. त्यामुळे मी एवढंच सांगतो की, आम्ही सर्वोच्च न्यायालयात इमानेइतबारे आमची भूमिका मांडली. पण मुळातच चुकीच्या पद्धतीने निर्णय झाल्याने आरक्षणाचा विषय टिकला नाही. बच्चू कडू म्हणतात ते खरं आहे की, फसवणाऱ्यांना सोडू नये. हे मराठा समाजाला माहिती आहे. त्यामुळे घोषणा करायच्या आणि लोकांच्या तोंडाला पाने पुसायची, असा प्रकार झाला आहे.

हा सरकारचा अंत आहे, असे आमदार बच्चू कडू म्हणतात. त्याप्रमाणे त्यांचा अंत होताना कडू आमच्या सोबत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे. ‘इंडिया’च्या आघाडीला ते घाबरले आहेत. त्यामुळे फाटे फोडण्याचे काम सध्या सुरू आहे. ‘इंडिया’ला घमेंडीया म्हणतात. पण जगाला माहीत आहे कोणात घमंड आहे ते. इंडिया आघाडी मजबूत आहे. त्यामुळे या सरकारचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही.

तेव्हा तोंड झाकलं होत का?

अशोक चव्हाण असताना समितीमध्ये सदस्य होते. तेव्हा तोंड झाकलं होत का? ते आपल्यावरची बला ढकलत आहेत. सत्तेत असलेल्या १८ मंत्र्यांनी भूमिका मांडली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत वडेट्टीवार म्हणाले, ‘माल कमाओ’ धोरण सुरू आहे. आमदारांना मालिदा वाटला जात आहे. मुंबई भकास केली जात आहे. कुंपण शेत खात आहे, अशी मुंबईची स्थिती झाली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांना कुणी आदेश दिला, दोषीला रजा आणि डीवायएसपी निलंबित कसे? या सगळ्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे म्हणजे ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ हे नार्कोतून स्पष्ट होईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT