Bhandara Bridge Sarkarnama
विदर्भ

Bhandara Bridge : राजकीय अनास्थेमुळे ईटान-कोलारी सेतू उभा राहिना

अभिजीत घोरमारे

Itan-Kolari : भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा जोडणाऱ्या वैनगंगा नदीवरील ईटान-कोलारी पूल अद्यापही अपूर्णच आहे. पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते योजनेतून 137 कोटी 37 लाख रुपयांच्या निधीला जुलै 2018 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर पुलाच्या सर्वेक्षणाचे कामही सुरू झाले. दोन महिन्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र काम संपलेच नाही

दोन वर्षांत पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या कामात दिरंगाई होत आहे. गेल्या वर्षी मार्च 2024 पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र 2024 मधील जानेवारी महिना लोटूनही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. 46 वर्षांपूर्वी किटाडी ते विरली जिल्हा मार्ग बांधकामादरम्यान ईटान-कोलारी पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

पुलाचा प्रस्ताव काही कारणांमुळे मागे पडला. त्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर या कामासाठी निधी देण्यात आला आहे. मात्र अद्याप भंडाऱ्यातील हा पूल निर्माणधीन आहे. काम संथ पद्धतीने सुरू आहे. या पुलाच्या उभारणीने इटान, विरली (खुर्द) व विरली (बुज) या गावांना महत्त्व येणार आहे. लाखांदूर तालुक्यातील अन्य गावांना त्याचा फायदा होणार आहे. 9.5 किलोमीटरच्या विरली ते इटान या बहुप्रतीक्षित रस्त्याचे व दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या पुलाचे साकोलीत भूमिपूजन झाले होते. तेव्हापासून या कामाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे.

पुलाचे काम पूर्ण झाल्यास वेळेची बचत होणार आहे व दळणवळण सोयीचे होणार आहे. या कामाला 2018 पासून सुरुवात झाली आहे. आता तब्बल 6 वर्षे लोटूनही काम पूर्णत्वास आलेले नाही. त्यामुळे या कामाला आणखी किती वर्षे प्रतीक्षा करावी लागणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ईटान-कोलारी सेतू उभारणीमुळे भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात दळणवळण सोयीचे होणार आहे. वेळेची बचत होणार आहे. याशिवाय ईटान, विरली/खुर्द व विरली/बुज या गावांना सुविधा मिळणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गावांमध्ये उद्योग व रोजगार निर्मितीला पुलामुळे चालना मिळेल. मात्र, हा सेतू पूर्ण करण्यास दिरंगाई होत असल्याने सर्वांना हा मार्ग सुरू होण्याची प्रतीक्षा आहे, अशी माहिती विरलीच्या सरपंच सीमा पारधी यांनी ‘सरकारनामा’ला दिली. कृती समितीच्या माध्यमातून दिलेल्या लढ्यातून ईटान-कोलारी सेतूनिर्मितिचा मार्ग मोकळा करून दिला आहे. परंतु, 2018 पासून सुरुवात झालेल्या या मार्गाचे आणि पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पुलाचे काम अर्धवट असल्याने भंडारा जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात येणे-जाणे करण्यासाठी लांबचा पल्ला गाठावा लागत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT