Dr. Manisha Kayande
Dr. Manisha Kayande Sarkarnama
विदर्भ

Manisha Kayande : 'तुम्ही केलं तर रासलीला; अन् आम्ही केलं तर कॅरेक्टर ढिला', असं का ?

Atul Mehere

Mumbai Legislative Council News : २५ वर्ष मुंबईत काही कामच झाले नाही आणि भाजपचे सरकार येताच विकासाची गंगा वाहायला लागली, असा जो प्रवीण दरेकर यांच्या बोलण्याचा सूर आहे, तो साफ चुकीचा आहे, असे म्हणत डॉ. मनीषा कायंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. (They Were with us for 25 years)

यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, गेली २५ वर्ष मुंबईत काहीच झाले नाही, असंच काहीसं भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर बोलले. पण बोलताना ते विसरले की, ती २५ वर्ष तेसुद्धा आमच्यासोबत होते. मग यासाठी ते स्वतः दोषी नाहीत का? त्यांना काही कळतच नव्हते का आणि आत्ता कुठे त्यांना महापालिका कळायला लागली आहे, असाच हा प्रकार दिसतो.

आम्ही पेन्ग्विन आणले म्हणून आजही त्या लोकांचे पोट दुखत आहे. आमच्या पेन्ग्विनला नाव का ठेवता, असे विचारत त्यामुळे महापालिकेला लाखो, कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो आहे, असे त्या म्हणाल्या. आरेच्या जंगलातल्या दोन हजार झाडांची तुम्ही रातोरात कत्तल केली. आम्ही आरे वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्याला जनता साक्षी आहे. पण तुम्ही कारशेडच्या नावाखाली जैवविविधता उद्ध्वस्त करायला निघाले आहात, असा घणाघाती आरोपही डॉ. कायंदे यांनी केला.

आरे जंगल म्हणजे अर्बन फॉरेस्टचा उत्तम नमुना आहे. ही जैवविविधता वाचवण्यासाठी जे तरुण पुढे आले, त्या तरुणांवर तुम्ही गुन्हे दाखल केले आणि त्यांचे भविष्य खराब केले. नागपूरच्या (Nagpur) मेट्रोवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. मेट्रोच्या कामांनी धुळीचे प्रदूषण वाढत आहे, ते वाढणारच पण त्यावर उपाययोजना तर करायला पाहिजे की नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

पेन्ग्विनपासून प्रेरणा घेऊन तुम्ही चित्ते आणले..

राज्यभरातील प्रशासकीय यंत्रणा तुमच्या हाताखाली आहे. महानगरपालिका आणि नगरपालिकांचे प्रशासक तुमच्या हाताखाली काम करत आहेत. तुमची माणसं बसवून तुम्ही वाट्टेल ते करवून घेता. दरेकरांनी आत्ता सांगितलेच की, आमची माणसं तेथे बसलेली आहेत. निविदा न काढता नुतनीकरणाची कामे केलेली आहेत. आम्ही आणलेल्या पेन्ग्विवर येवढा आक्षेप का? खरं तर आमच्या पेन्ग्विनपासून प्रेरणा घेऊनच तुम्ही चित्ते आणले, असे म्हणत डॉ. कायंदे (Dr. Manisha Kayande) यांनी थेट केंद्र सरकारवर हल्ला चढवला.

तुम्ही केले तर रासलीला अन् आम्ही केलं तर कॅरेक्टर ढिला, असा हा प्रकार आहे. आग लागण्याचे आणि आग लावण्याचे प्रकार वाढत आहेत. मुंबई (Mumbai) महानगरपालिकेने (Municipal Corporation) सहा हजार कोटीचे कॉंक्रीटीकरणाचे टेंडर काढले. जे रस्ते करायला पाहिजे, तेथे करत नाही. पण जेथे यांची कार्यालये आहेत तेथेच कॉंक्रीटके रस्ते करत आहेत. हे करताना प्रदुषणाची कुठलीही काळजी घेतली जात नाहीये. प्रदूषणावर केवळ गप्पा मारू चालणार नाही. दिल्लीपेक्षा वाईट अवस्था मुंबईची झाली आहे, असा आरोप डॉ. मनीषा कायंदे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT