Manohar Joshi & Devendra Fadnavis. Sarkarnama
विदर्भ

Manohar Joshi : मुख्यमंत्री मनोहर जोशींनी महापौर फडणवीसांना काय मागितले होते...?

प्रसन्न जकाते

Manohar Joshi : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे शुक्रवारी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे 3 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आठवणींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उजाळा दिला आहे. फडणवीस म्हणाले की, उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते. त्यावेळी आपण नागपूरचे महापौर होतो.

अधिवेशन काळात मुख्यमंत्री असलेल्या जोशी सरांचे वाहन खराब झाले होते. तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितले की, दुसरे वाहन आपल्याला पाहिजे असेल, तर महापौरांचे वाहन चांगले आहे ते घेता येईल. आपल्याला निरोप आला की, भेटायला या. आपण भेटायला गेलो तेव्हा आपल्याला जोशी सर म्हणाले की, माझी गाडी बंद पडली आहे, माझ्याकडे गाडी नाहीये मला नागपूरच्या महापौरांचे वाहन मिळेल का? आपण म्हणालो, हा आमचा बहुमान आहे. त्यांनी ते वाहन दोन ते तीन दिवस वापरले, ते दोन-तीन सभेत गेले तिथे ते आवर्जून सांगायचे, मी मुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी मी वाहन मुख्यमंत्र्यांचे नाही, तर महापौरांचे आणले आहे. त्यांची भेट समृद्ध करायची, असेही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीस म्हणाले की, मराठी माणूस काय करू शकतो, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मनोहर जोशी सर आहेत. मनोहर जोशी सरांना भेटणे म्हणजे समृद्ध होणे. मनोहर जोशी आमचे नेते असल्याने अनेकदा त्यांची भेट होत होती. मनोहर जोशी यांच्यासंदर्भात ट्विट करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता. नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा आणि विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. महाराष्ट्रातील जुने आणि जाणते नेतृत्व आपण गमावले आहे.

फडणवीस म्हणतात की, अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT