Manoj Jarange Sarkarnama
विदर्भ

Manoj Jarange Patil : ४०व्या दिवशी सरकारला दाखवू खरं आंदोलन काय असतं !

Atul Mehere

Maratha Reservation News : विदर्भातील मराठा समाज शेती करतो. त्यांपैकी अनेक मराठ्यांना सरकारने आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र दिले आहे. विदर्भातील मराठा समाज आणि उर्वरित महाराष्ट्रातील मराठा समाज काय वेगळा आहे का, असा सवाल उपस्थित करीत मनोज जरांगे यांनी अंतरवालीतून सरकारवर निशाणा साधला. (Is the Maratha community different in Vidarbha and the rest of Maharashtra?)

येथे संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा, असा अल्टिमेटम जरांगे यांनी राज्य सरकारला दिला. मराठा, कुणबी आदी मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. ही समिती सरकारने आता फेकून द्यावी. आमच्याकडून सरकारने आरक्षणासाठी ४० दिवसांचा वेळ मागून घेतला आहे. त्यांपैकी ३० दिवस झाले आहेत.

मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळाले नाही आणि कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले नाही, तर खरे आंदोलन काय असते हे सरकारला ४० व्या दिवशी दाखवून देऊ, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. ऑक्टोबर हिटचे चटके सहन करत जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे आयोजित सभेला राज्यभरातील मराठा समाजाने तुफान गर्दी केली आहे.

मराठा समाज खरोखर शिस्तबद्ध

सभेच्या अनुषंगाने पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मात्र, मराठा समाज खरोखर शिस्तबद्ध आहे, अशी स्तुती पोलिसांनीही केल्याचे जरांगे व्यासपीठावरून म्हणाले. पोलिस प्रशासन आपल्याला पूर्ण सहकार्य करत आहे. त्यामुळे मराठा समाजाने ही शिस्त बाळगत पोलिसांना सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन जरांगे यांनी केले.

सरकार विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्यांवर अन्याय करीत आहे. विदर्भातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, राज्यातील इतर मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यायला काय हरकत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यातील कोणत्याही प्रदेशातील मराठा हा एकच आहे. त्यामुळे विदर्भातील मराठ्यांना वेगळ्या न्याय, वेगळे प्रमाणपत्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्यांना वेगाने व वेगळे प्रमाणपत्र हे कसं काय शक्य आहे, असा प्रश्नही त्यांनी केला.

वज्रमूठ सुटणार नाही

मराठा समाजातील आंदोलन पैशांसाठी नाही तर समाजाच्या न्यायासाठी सुरू आहे. मराठा समाजाला त्यांचे हक्क हवे आहेत. जोपर्यंत हे हक्क मिळणार नाहीत, तोपर्यंत मराठा समाज राज्यभर संघर्ष करीत राहील, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. राज्यातील मराठा समाजाचे हाल आम्ही सहन करणार नाही. त्यासाठी आम्ही सर्वांनी वज्रमूठ बांधली आहे. आता ही मूठ आरक्षण मिळाल्याशिवाय सुटणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

मराठ्यांना अंगावर घेऊ नका

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मनोज जरांगे यांनी व्यासपीठावरून सज्जड दम दिला. महाराष्ट्रातील मराठ्यांना अंगावर घ्यायची हिंमत करू नका. उगाच आरक्षणाला विरोध करू नका. आम्ही कुणाच्याही वाट्याला गेलेलो नाही. आम्ही आमचा हक्क मागत आहोत. हा विरोध बंद न झाल्यास आणि न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षणाच्या मुद्द्यात अडचणी टाकणाऱ्यांनी वेळी सावध न झाल्यास परिणाम भोगावे लागतील, असेही जरांगे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT