Ramdas Athawale Sarkarnama
विदर्भ

Maratha Reservation : RSS चा विरोध झुगारत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली मोठी मागणी, म्हणाले, " जातनिहाय जनगणना..."

सरकारनामा ब्यूरो

Maratha Reservation In Maharashtra Latest News : जातनिहाय जनगणनेची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनीही ही मागणी केली आहे. पण जातनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला आहे. अशातच केंद्रात मंत्री असलेल्या रामदास आठवलेंनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. ते यवतमाळमध्ये बोलत होते.

राज्यात आरक्षणासाठी मराठा, धनगर समाजाची आंदोलने सुरू आहेत. मराठा आरक्षणावरून ओबीसी-मराठा असा वाद रंगला आहे. बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाली. तशाच प्रकारे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याची मागणी राज्यातील काही प्रमुख नेते आणि मंत्र्यांकडून होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र जातनिहाय जनगणनेला विरोध केला आहे. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करत जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. यामुळे सरकारची कोंडी झाल्याचे चित्र आहे.

जातनिहाय जनगणनेवर काय म्हणाले आठवले?

आरक्षणाचा वाद मिटवण्यासाठी ज्या जातीची जेवढी टक्केवारी, तेवढे आरक्षण त्या जातीला द्यावे, असे रामदास आठवले म्हणाले. कोणत्या जातीची लोकसंख्या किती टक्के आहे, हे कळणे गरजेचे आहे. मराठा समाज 35 टक्के असल्याचा दावा केला जातोय. इतर समाजाच्या लोकांकडून वेगवेगळी आकडेवारी दिली जातेय. मोघम आकडेवारीचा विचार केल्यावर ती कितीतरी कोटींच्या घरात जाते. यामुळे कुठल्या जातीची नेमकी किती टक्केवारी आहे हे कळण्यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या जातीची जेवढी टक्केवारी तेवढे आरक्षण त्या जातीला द्यावे. असा निर्णय झाल्यास लोकसंख्येच्या आधारावर आमची टक्केवारी 15 टक्के होते. त्यामुळे आम्हाला 15 टक्के आरणक्ष मिळेल. महाराष्ट्रात आमची 13 टक्के लोसंख्या आहे. त्यानुसार 13 टक्के आरक्षण मिळावे. अशा प्रकारे इतर समाजाला आरक्षण दिले जात असेल तर आनंद आहे, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रात सर्वात आधी मराठा आरक्षणाची मागणी मी केली होती. कोणाची आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळायला पाहिजे. सर्वच मराठे श्रीमंत नाहीत आणि आमदार-खासदार किंवा उद्योगपतीही नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची आग्रही मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT