Chandrashekhar Bawankule Google
विदर्भ

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करून उपयोग नाही, बावनकुळेंचे आवाहन !

प्रसन्न जकाते

Manoj Jarange Maratha Andolan : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार अत्यंत गंभीर आहे. आता तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर शपथ घेतली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर नेत्यांना गावबंदी करून काहीही फायदा होणार नाही. मराठा आंदोलकांचे म्हणणे हे नेतेच सरकारपर्यंत पोहोचवत आहेत. (It is the leader who is conveying the statement of the Maratha protesters to the government)

नेत्यांना गावबंदीचा निर्णय संयुक्तिक ठरणार नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. नागपुरात बुधवारी (ता. २५) त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की, एकनाथ शिंदेंसारखे नेते शिवाजी महाराजांच्या समोर शपथ घेत आहेत, तर त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवायला हवा. खरंतर एकनाथ शिंदे यांचं महाराष्ट्रातील जनतेने अभिनंदन करायला पाहिजे. अशा पद्धतीने जाहीर वचन आणि जाहीर शपथ घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इतिहासातील पहिले मुख्यमंत्री असतील, असे बावनकुळे म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडेही मागणी केली आहे. सरकारमधील मुख्यमंत्र्यांचे सर्व मंत्री मराठा आरक्षणावर काम करत असतील, तर नेत्यांना गावबंदी करायची का, याचा निर्णय आंदोलक योग्य त्या पद्धतीने घेतील. मात्र, महाराष्ट्रातील सगळी जनता आरक्षण मिळावे, या बाजूने असेल तर नेते मंडळींना गावबंदी करून काही फायदा होणार नाही, असे ठाम मत आमदार बावनकुळे यांनी व्यक्त केले.

कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचे म्हटल्यास संविधानाने काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. त्यातील काही विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहेत, तर काही राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात येतात. राज्यातील इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर गदा येऊ न देता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, यासाठी सरकार गेल्या ४० दिवसांपासून प्रयत्न करीत आहे.

सर्व कायदेशीर बाबी तपासून मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळणार आहे. मात्र, तोपर्यंत मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, अशी कळकळीची विनंतीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मराठा समाजातील कार्यकर्त्यांची माथी भडकवण्यासाठी काही असामाजिक तत्त्व सक्रिय झाले आहेत. मराठा समाजाला आक्रमक करण्यासाठी ते छुपे प्रयत्न करीत आहेत.

आपल्याला आरक्षण मिळणार ही बाब निश्चित असतानाही मराठा समाजाने अशा कोणत्याही चिथावणीखोरांना अजिबात थारा देऊ नये, अशी विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मराठा समाजाने इतके दिवस प्रतीक्षा केली आहे. अजून थोडी कळ सोसावी. त्यांना सरकारकडून आरक्षण नक्कीच मिळेल, यात तीळमात्र ही शंका नाही, असा ठाम विश्वास महायुती सरकारच्या वतीने आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT