Dr. Ashok Jeevtode and Manoj Jarange Sarkarnama
विदर्भ

Maratha Vs OBC Community : जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर ओबीसी समाज ‘अलर्ट’ मोडवर!

संदीप रायपूरे

Chandrapur District Political News : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी आज अंतरवालीतून एल्गार पुकारला. एक तर माझी प्रेतयात्रा निघेल किंवा आरक्षणाची विजययात्रा निघेल, असे सांगत त्यांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करूनच राहू, असा निर्धार केला. यासाठी त्यांनी सरकारला १० दिवसांचा अल्टिमेटमही दिला. (OBC leaders in Chandrapur have reacted)

जरांगेंच्या विधानावरून चंद्रपुरातील ओबीसी नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शासनाने मराठ्यांना आरक्षण जरूर द्यावे, त्याला आमचा विरोध नाही; पण ओबीसीतून त्यांना कुठल्याच स्थितीत आरक्षण देऊ नये, यावर आम्ही ठाम असल्याचे मत ओबीसीचे नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी मांडले.

ओबीसींचे चंद्रपुरातील उपोषण सोडवल्यानंतर तीन दिवसांत मंजूर मागण्याचे इतिवृत्त प्रकाशित करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पण अजूनही ते आश्‍वासन पूर्ण झाले नसल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी सांगितले. जरांगे पाटील मराठ्यांना ओबीसीत समावेश करण्याबाबतची भूमिका जाहीर केल्यानंतर ओबीसी समुदायही आता ‘अलर्ट’ झाला आहे.

राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करावा व त्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र द्यावे. येत्या दहा दिवसांत असे झाले नाही तर मी जरांगे-पाटील आहे. हे शासनाने लक्षात ठेवावे, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. आज आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे-पाटील काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, जरांगेंच्या विधानानंतर आता ओबीसी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ओबीसींचे नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी कुठल्याही स्थितीत मराठ्यांचा ओबीसीत समावेश करू नये. सरकारने त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण जरूर द्यावे, याला आमचा कुठलाच विरोध नसल्याचे सांगितले. या मुद्द्यावर काल (ता. १३) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका मांडल्याची आठवण डॉ. अशोक जिवतोडे यांनी करून दिली. मराठ्यांना आरक्षण यावे व त्यांचा ओबीसीत समावेश करावा, या मागणीसाठी जरांगे पाटलांनी आमरण उपोषण केले होते.

कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांचा समावेश ओबीसीत करू नये, यासाठी चंद्रपुरातून ओबीसींनी एल्गार पुकारला होता. जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने महामोर्चा काढण्यात आला होता. याच मुद्द्यावर रवींद्र टोंगे तब्बल बावीस दिवस आमरण उपोषणाला बसले होते. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः चंद्रपुरात येऊन आंदोलन सोडविले. या वेळी सर्व मागण्या मान्य करीत असल्याचे फडणवीसांनी सांगितले होते.

याच विषयावर उद्या (ता. १५) चंद्रपुरात बैठक बोलाविण्यात आली आहे. मराठा हा एक समाज आहे. दुसरीकडे ओबीसींमध्ये शेकडो जाती येतात. आमची ताकद काही कमी नाही, असे सांगत राजूरकर यांनी ओबीसीत मराठ्यांचा समावेश नकोच, ही भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील जातीनिहाय जनगणनेची मागणी का करीत नाही, असा टोला राजूरकरांनी लगावला आहे. एकीकडे मराठे ओबीसीत समावेशाची मागणी रेटून धरत आहेत, तर दुसरीकडे ओबीसी मात्र मराठ्यांचा ओबीसीत समावेश नको, या मागणीवर ठाम आहेत. राज्य सरकारची मोठी कोंडी झाली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT