Maratha Reservation and Government Sarkarnama
विदर्भ

Maratha Reservation : सरकारनं दगा फटका केल्यास बच्चूभाऊ करणार ‘प्रहार’

Amar Ghatare

Amravati Political News : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा पेटला आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं बेमुदत उपोषण सध्या स्थगित केला आहे. आता या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर आमदार कडू यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय करणार, ते स्पष्ट केलं आहे.

सरकारसोबत मध्यस्थी करीत दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे. मात्र, या काळामध्ये जर सरकारने मराठ्यांसोबत दगाफटका केला, तर आपण मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहू व आंदोलनात सहभागी होऊन सरकारला घेरू, असा थेट इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे. (MLA Bachchu Kadu clears his role to support Manoj Jarange Patil if the government cracks down on the Maratha reservation issue)

गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन धगधगत आहे. अनेक जिल्ह्यांत जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. राजकीय नेत्यांना जिल्हाबंदी, गावबंदी आहे. अशात बच्चू कडू यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपला जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं जाहीर केलं आहे. जरांगे उपोषणावर असताना कडू यांनी त्यांना ‘एक घोट तरी पाण्याचा घ्यावा’, अशी विनंती केली होती. त्यावर जरांगे पाटील यांनी बच्चू कडूंचे आभार व्यक्त केले होते.

जरांगे पाटील यांनी आभार मानताच बच्चू कडूंनी रक्त सांडून नव्हे, तर रक्तदान करून आम्ही मराठा आंदोलनाला पाठिंबा देऊ असं म्हटलं होते. बुलडाणा जिल्ह्यातील माँ जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथं त्यांनी रक्तदानही केलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. सरकारसोबत तडजोड करण्यासाठी जरांगे यांच्यासोबत बोलणी केली. दुसऱ्या दिवशीच सरकारचं शिष्टमंडळ घेऊन बच्चू कडू थेट अंतरवाली सराटी येथं पोहोचले. सरकार व जरांगे पाटील यांच्यासाेबत चर्चा करून त्यांनी उपोषणावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांचा अवधी सरकारला दिला व आपला उपोषण मागे घेतलं. जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबर ही तारीख दिली होती. मात्र, सरकारनं त्यांना हा संपूर्ण तिढा सोडण्यासाठी २ जानेवारी ही तारीख मागितली आहे. तारखेचा घोळ काहीही असला तरी सरकारनं २४ डिसेंबर ही तारीखच अंतिम समजून काम करावं, अशी अशी विनंती आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. तारीख महत्त्वाची नाही तर मराठ्यांना आरक्षण हे लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी दिलं पाहिजे, अशी मागणी आहे. त्यामुळं सरकारनं तत्काळ आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करावी, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

सरकारनं २ जानेवारी ही तारीख मागितली आहे. मात्र, यामध्ये जर सरकारनं मराठ्यांसोबत दगा फटका केला, तर आपण जरांगे पाटील यांच्यासाेबत व मराठा समाजासोबत उभा राहू. त्यांच्या सोबत आंदोलनात सहभागी होऊन व सरकारला घेरू, असा थेट इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.

(Edited By : Prasannaa Jakate)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT