Bachchu Kadu News  Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu News : बच्चू कडू श्रीरामाला करणार सोयाबीन, कापूस अर्पण; 'मेरा देश, मेरा खून’ मोहिमेसाठी अयोध्या...

जयेश गावंडे

Akola News : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू 'मेरा देश मेरा खून' ही मोहीम राबविणार आहेत. यासाठी ते दोन दिवसांचा अयोध्या दौरा करणार आहेत. देशात शेतकरी-सैनिक राष्ट्रवाद प्रस्थापित करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय किसान क्रांती दलाचे अमरेश मिश्रा आणि राम तिवारी यांच्या निमंत्रणावरून २९ आणि ३० ऑक्टोबर दोन दिवस उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या दौऱ्यामध्ये सहभागी हाेणार असल्याची माहिती आहे.

या दौऱ्यादरम्यान ते अयोध्येला भेट देणार आहेत. 'प्रहार'चे आमदार राजकुमार पटेल, अमरेश मिश्रा आणि राम तिवारी यांच्यासह प्रथम हनुमानगढीला भेट देणार आहेत. त्यानंतर श्रीराम आपल्या जन्मस्थानी जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतील. या दर्शनात बच्चू कडू प्रभू श्री रामाला उसाची मोळी, धान, सोयाबीन, कापूस अर्पण करतील. ऊस, कापूस, सोयाबीन, कांदा यासह प्रत्येक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी बच्चू कडू हे भगवान श्री रामांची प्रार्थना करणार आहेत. 15 ऑक्टोबरला बच्चू कडू यांनी मुंबईत ‘मेरा देश मेरा खून’ मोहिमेची घोषणा सीएसटीसमोरील मंगल गडिया आणि सय्यद हुसेन या शहीद स्मारकास अभिवादन करत केली.

काँग्रेसवर आरोप...

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने भारताची शेती, उद्योग आणि भांडवल काही प्रमाणात विकसित केले; पण काँग्रेसने ना इंग्लंडकडून ४५ ट्रिलियन डॉलर्स परत मागितले ना इंग्रजांच्या गुलामगिरीची चिन्हे काढून टाकली. काँग्रेसने अर्धवट जमीन सुधारणा केल्या. काँग्रेसचा मुख्य भर शहरी विकासावर होता. त्यामुळेच शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांची किंमत स्वतः ठरवण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. याशिवाय काँग्रेसने ESMA सारखे कायदे आणले, ज्यामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्व उत्पादनांच्या किमती ठरवण्याचा अधिकार सरकारकडे गेला. त्यामुळेच 1960 च्या दशकात हरितक्रांती होऊनही भारत कृषी क्षेत्रात मागेच राहिला. ही प्रक्रिया आजतागायत सुरू असल्याचे बच्चू कडू म्हणाले. आज भारतावरील आंतरराष्ट्रीय वित्त भांडवलाची (IFC) पकड वाढत आहे. IFC साठी भारत स्वस्त मानसिक आणि शारीरिक श्रमाचे केंद्र बनत असल्याचे कडू म्हणाले.

असा आहे दौरा

मिश्रा आणि राम तिवारी यांच्या निमंत्रणावरून 29-30 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचा दोन दिवसांचा दौरा करतील. भगवान श्रीरामाची प्रार्थना केल्यानंतर ते प्रहार आणि राष्ट्रीय किसान क्रांती दलच्या टीमसोबत अयोध्येतील रामजन्मभूमी संकुलात असलेल्या कुबेर माऊंटलाही भेट देतील. महंत राम चरण दास आणि मौलवी अमीर अली यांना ब्रिटिशांनी १८ मार्च १८५८ रोजी कुबेर माऊंटवर फाशी दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT