Navnit Rana
Navnit Rana Sarkarnama
विदर्भ

खासदार नवनीत राणा म्हणाल्या, केंद्र सरकारमुळे गडगडले सोयाबीनचे भाव...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : सोयाबीनचे भाव कधी नव्हे येवढे घसरले आहेत. या परिस्थितीला केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे. पूर्वी १० हजार रुपये भाव मिळत होता. पण केंद्र सरकारने सोयाबीनची आयात सुरू केल्यापासून १० हजार रुपयांचा भाव अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे ४ हजार रुपयांवर आला आहे. केंद्र सरकारने सोयाबीनची आयात थांबवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यासाठी आज केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची भेट घेतल्याचे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.

खासदार राणा म्हणाल्या, सोयाबीनचे भाव पूर्ववत व्हावे, यासाठी कृषिमंत्र्यांची भेट घेतली. आता याच प्रश्‍नासंदर्भात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचीही भेट घेणार आहे. सोयाबीनची आयात थांबविल्याशिवाय सोयाबीनचे भाव पूर्ववत होणार नाहीत आणि तोपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. कारण महाराष्ट्रात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात होते आणि हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी यासंदर्भात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिलेले आहे. आता शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जनसामान्यांचे फार मोठे नुकसान झाले. पण त्यापेक्षाही शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. शेतच्या शेत पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट झाली आहे. या शेतकऱ्यांना आता राज्य व केंद्र सरकारने मदत केली पाहिजे. दोन्ही सरकार एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे झाले, तरच त्यांच्यावरील संकटातून दिलासा मिळू शकतो.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. कृषिमंत्र्यांना राज्यातील पूर परिस्थितीचीसुद्धा माहिती दिली आहे. पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३० हजार रुपये नुकसान भरपाई देऊन केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत करण्याची मागणी नवनीत राणा यांनी कृषिमंत्री तोमर यांच्याकडे केली. तर जुलै ते ऑगस्ट महिन्यात सोयाबीनला १० हजार रुपये भाव होता. मात्र केंद्र सरकारने सोयाबीन आयात केले ती आयात केंद्र सरकारने थांबवण्याची मागणी करत सोयाबीनला १० हजार रुपये भाव कायमस्वरूपी ठेवण्याची मागणीही नवनीत राणा यांनी केली. शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार असल्याचा विश्‍वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT