Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Nagpur Wadettiwar News : सरकार ४० दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते, वडेट्टीवारांचा घणाघात !

Atul Mehere

Nagpur Political News : आज मंत्रिमंडळामध्ये काही ठोस निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असल्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आरक्षणासाठी बैठकीत काय निर्णय घेते, याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे, असे राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. (Law and order issue has arisen during the agitation)

आज (ता. ३१) नागपुरात वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. तसा मराठा समाज शांत आहे, पण सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्यावर आक्रमक होण्याची वेळ आली आहे. आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात दररोज कुठे ना कुठे शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे. हे आंदोलन संपवून मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना भेटून करण्यात आली आहे. ही सरकारने लावलेली आग आहे. सरकारच्या चुकीच्या घोषणांमुळे, निर्णयांमुळे आणि खोट्या आश्वासनांमुळे महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती गंभीर झालेली आहे. अशा वेळी प्राधान्याने आरक्षणाचा प्रश्‍न सोडवणे गरजेचे झाले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

जरांगे पाटलांनी आधीच सांगितलं आहे की, आमचा सरकारवर विश्वास नाही. राज्य सरकारने जनतेचा विश्‍वास गमावलेला आहे. मुळातच हे सरकार असंवैधिनिक आहे. ट्रिपल इंजिनचे हे सरकार कामाचे नाही. कारण जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नाही. अडचणीची वेळ आली असताना आणि ठोक निर्णय घेण्याची गरज असताना सत्तेतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर जबाबदाऱ्या ढकलत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. त्या मुदतीत सरकारने काहीही केले नाही. ४० दिवस हे सरकार अजगरासारखे सुस्त पडले होते, असा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला. आरक्षणाचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं. आजच्या (ता. ३१) मंत्रिमंडळात हा ठोस निर्णय सरकार घेणार का, यावर आमचं लक्ष असणार आहे, असेही ते म्हणाले.

मराठा समाजाचे आंदोलन सोडवले पाहिजे आणि त्यांनी केलेल्या मागण्या तातडीने पूर्ण केल्या पाहिजेत. शासकीय किंवा कुणाच्याही मालमत्तेचे नुकसान करून काही होणार नाही. यात काहींचे जीव गेले तरीही समाजाला त्याचा उपयोग नाही. उलट समाजाचे नुकसानच आहे. त्यामुळे मराठा बांधवांनी शांततेने आंदोलन करावे. समाजाच्या आंदोलनाला यश मिळवून देण्याचे काम सरकार करेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT