Nana Patole
Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole म्हणाले बदला घेण्यासाठी एकत्रित लढा, वंजारींच्या विजयाची पुनरावृत्ती झालीच पाहिजे...

सरकारनामा ब्यूरो

Amravati Graduate Constituency Election : पश्चिम विदर्भात भाजपविरुद्ध रोष आहे. महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलण्याची ताकद विदर्भात आहे. अमरावती (Amravati) विभाग पदवीधर मतदारसंघात प्रा. बी. टी. देशमुख यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्वांनी एकत्रित लढाई लढणे गरजेचे आहे.

नागपूरमध्ये (Nagpur) अभिजित वंजारी यांनी मिळवलेल्या विजयाप्रमाणे अमरावतीत विजय मिळाला पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले. अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्या समर्थनार्थ अमरावती शहरातील वऱ्हाडे मंगल कार्यालय येथे सभा पार पडली, यावेळी पटोले बोलत होते.

माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, आमदार वजाहत मिर्झा, आमदार अभिजित वंजारी, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख, माजी खासदार अनंत गुढे, सहसंपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष प्रशांत डवरे, काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले व मिलिंद चिमोटे उपस्थित होते.

नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत गेली बारा वर्षे भाजपच्या विद्यमान आमदाराने पदवीधर, शिक्षक व बेरोजगारांचे काय प्रश्न मांडले, असा सवाल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, काल अमरावतीत फडणवीस पुन्हा खोटेच बोलले. त्यांच्या २०१४ ते २०१९ या सत्ताकाळात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, विदर्भाच्या विकासाचा वेग थांबला, त्यांनी या काळात विशिष्ट लोकांना मोठे करण्यासाठी शक्ती खर्ची घातली. आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी लढत असून विदर्भाचा सत्यानाश करणाऱ्यांविरुद्ध व प्रा. बी. टी. देशमुख यांच्या पराभवाचा बदला या निवडणुकीतून घेण्याची संधी आली आहे.

वऱ्हाडासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून नागपूरप्रमाणे ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकणारच, असा दावा त्यांनी केला. प्रा. वसंत पुरके, आमदार नितीन देशमुख यांचीही यावेळी भाषणे झाली. प्रा. वसंत पुरके यांनी विजय मिळाल्याचा आनंद मोठा राहणार असला तरी पराभव आपल्यासाठी नामुष्कीचा राहणार असल्याचा सूचक इशारा दिला. सभेला जिल्हाभरातून मविआतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी काहीजण इच्छुक होते. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच धिरज लिंगाडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. लिंगाडे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच असून काही काळासाठी ते बाहेर गेले होते. आता ते परत आले आहेत. महाविकास आघाडीत यासंदर्भात काहीच मतभेद नाहीत, असा खुलासा नाना पटोले यांनी सभेनंतर प्रसारमाध्यमांसोबत बोलताना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT