Nana Patole and Devendra Fadanvis
Nana Patole and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Nana Patole Statement: फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट होती, ती आज खरी होताना दिसत आहे...

सरकारनामा ब्यूरो

Nana Patole's Accusations Against Fadnavis: अंबानींच्या घरासमोर जिलेटिन ठेवणे आणि त्यानंतर जो नाट्यक्रम घडत गेला आणि त्याचा शेवट राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये जाण्यात झाला. ही सर्व स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली होती, हे मी तेव्हा म्हटले होते. पण आता ते विधान खरे ठरताना दिसत आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. (The script was written by Devendra Fadnavis)

आज (ता. १६) नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, मी विधानसभा अध्यक्ष असताना एकदा दिल्लीला गेलो होतो, तेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांनी मला विचारले होते की, तुमच्याकडे परमबीर सिंह नावाचे आयपीएस अधिकारी कोणी आहेत का? मी म्हटलं हो, आहेत. त्यावर ते म्हणाले, त्यांच्या भ्रष्टाचाराची फाईल आमच्याकडे आली आहे, पीएमओकडेही गेली आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेही गेली आहे.

फार भ्रष्ट अधिकारी आहे तो, असं ते म्हणाले होते. तेथून आल्यावर परमबीर सिंह मला भेटायला आले. त्यांना मी हा किस्सा सांगितला. त्यावर ते म्हणाले की आमच्या विभागाचे काही लोक आहेत की, जे अशा तक्रारी करत असतात. त्यानंतर मला मिळालेल्या माहितीनुसार परमबीर सिंह हा खरोखरच भ्रष्ट अधिकारी आहे, हे सिद्ध झालं.

त्याच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले होते की, त्याच्या निलंबन प्रक्रियेमध्ये विनाकारण मुदतवाढ देण्यात येत आहे. यामध्ये कॅगच्या आदेशाचेही उल्लंघन झाले. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन सरकारने केले नाही. ॲंटेलियामध्ये स्फोटके ठेवण्याचे जे नाट्य घडवण्यात आले, ते पूर्व नियोजित होते.

तेव्हा विधानसभेतही मी सांगितले होते, की फडणवीसांनी ठरवलेली ती स्क्रिप्ट आहे. ते आता खरं होताना दिसत आहे. कारण फडणवीसांनी गृहमंत्र्यांवर तो आरोप केला होता. अनिल देशमुखांच्या प्रकरणात १०० कोटींचा हिशोब शेवटपर्यंत लागलाच नाही. ते आणले कुठून, हा प्रश्‍न तेव्हाही निर्माण झाला होता आणि परवा परमबीर सिंह यांच्या बाबतीत जो आदेश देण्यात आला त्यात उच्च न्यायालय आणि कॅगच्या आदेशाचेही पालन करण्यात आले नाही.

देवेंद्र फडणवीसांनी आणि केंद्र सरकारने महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी तो कट केला होता. सरकारने तांत्रिक दृष्ट्या कॅटच्या फेऱ्यातून परमबीर सिंहला बाहेर काढले. त्याला अनिल देशमुखांच्या विरोधात प्यादा म्हणून वापरले. त्याच्यावरचे सर्व आरोप मागे घेतले आणि पूर्वलक्षी प्रभावाने त्याला सर्व फायदे देण्यात आले. एखादा अधिकारी स्वतःच्या मंत्र्यावर गृहमंत्र्यांवर आरोप करत आहे. त्यामध्ये राज्याची बदनामी झाली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडले नव्हते, असे नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्राला (Maharashtra) कलंक लावण्यासाठी, राज्यात सत्ता मिळवण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) सत्तेचा दुरुपयोग केला, की राज्याच्या भाजप (BJP) नेत्यांनी हे काम केले. हेसुद्धा आता कळायला लागले आहे. राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम भाजपच्या लोकांनी केले. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हे प्रकरण स्पष्ट केले पाहिजे. अंबानीच्या घरासमोर जिलेटिन ठेवण्याचे जे नाट्य होते, त्याचा खुलासा त्यांनी करावा, ही आमची मागणी आहे. विधानसभेतही हा प्रश्‍न उपस्थित करणार आहोत, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT