Amol Mitkari On Raj Thackeray Sarkarnama
विदर्भ

Amol Mitkari Vs MNS : मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडल्यानंतर अमोल मिटकरी संतापले, म्हणाले,'या अशा हल्ल्यांना...'

Deepak Kulkarni

Akola News : महाराष्ट्रात सध्या मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात वादाचा भडका उडाला आहे. पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पूरस्थितीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकेची झोड उठवली होती. अजित पवार पुण्यात नसतानाही धरणं भरुन वाहिली अशा शब्दांत त्यांनी डिवचलं होतं.

यावर विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंनी सुपारी बहाद्दर असा उल्लेख करत झोंबणारी टीका केली होती. यावरुन मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून अकोल्यात आता मनसे कार्यकर्त्यांनी थेट मिटकरींची थेट गाडीच फोडली. या तोडफोडीनंतर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.आता मिटकरी यांनी मनसेवर हल्लाबोल केला आहे.

आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडल्यानंतर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी या मनसेच्या हल्ल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राचं नाव घेतात आणि अशाप्रकारे गुंडागर्दी करतात.हा भेकड हल्ला आहे.या हल्ल्यांना मी घाबरत नाही असं त्यांनी ठणकावून सांगतानाच मनसेला इशाराच दिला आहे.

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले...?

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, या हल्ल्यावेळी मी अकोला येथील विश्रामगृहात होतो.काहीजण मला भेटायला आले होते.त्यासाठी मी येथे आलो होतो.पण मी आत असतानाच मनसेच्या कार्यकर्त्याने हा हल्ला केला.मी याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करणार असल्याचंही मिटकरींनी यावेळी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसे(MNS) कार्यकर्त्यांनी फोडली आहे. अकोल्यातील विश्रामगृहात ते थांबलेले असताना आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्या गाडीवर दगड मारले व कुंड्या फेकल्या. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ठाकरे यांना सुपारीबाज म्हटल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर अकोल्यात मंगळवारी ही घटना घडली आहे.

मिटकरींचं वादग्रस्त विधान काय ?

राज ठाकरे यांनी पुण्यात अजित पवारांवर टीका केली होती. त्यावर पलटवार करताना आमदार अमोल मिटकरी यांनी ठाकरेंचा सुपारीबाज असा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की, दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण, हे सुपारीबहाद्दर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कोणतं आंदोलन असेल ते जीवनात कधीच यशस्वी करू शकले नाहीत.

विश्वासाहर्ता या व्यक्तीची संपलेली आहे. राजकारणात, महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं, म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.

यावर मनसेच्या गजानन काळे यांनीही खोचक टीका केली होती. म्हणाले,टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला ...आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं,लायकीत असा इशारा काळे यांनी मिटकरी यांचे नाव न घेता एक्सवर दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT