Rohit Pawar, Sharad Pawar & Ajit Pawar. Google
विदर्भ

Amravati : अजितदादांसोबत मी ‘बिझनेस’ केला असता, तर फायदा झाला असता...

Amar Ghatare

MLA Rohit Pawar News : ‘शरद पवार यांची साथ सोडत ज्यावेळी अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झालेत, त्याच वेळी मलाही त्यांच्यासोबत जाण्यासाठी संधी होती. खरं तर मी व्यवसायात आहे. त्यामुळं मी त्यावेळी बिझनेस केला असता, तर फायद्यात राहिलो असतो. पण मी साहेबांना सोडून गेलो नाही’, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले.

युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं रोहित पवार सोमवारी (ता. 4) अमरावतीमध्ये होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (NCP Sharad Pawar Group MLA Rohit Pawar Said He Was Also Having Chance To Get Benefits While Ajit Pawar Left Party)

काही लोकांनी शरद पवार यांना सोडण्यासाठी ‘बिझनेस’ केला. मी व्यावसायिक आहे. मला पण ते करता आलं असतं. माझ्यावर जी कारवाई झाली, ती कधीच झाली नसती. पण आम्ही वेगळी भूमिका घेतली. आम्हाला माहिती होतं की भाजप ताकदवान आहे. त्यांच्याकडं जास्त पैसा आहे. सर्व सरकारी यंत्रणा आहे. त्यानंतरही आम्ही पवारसाहेबांसोबत राहिलो. त्यामुळं आज आपल्याला लढावं लागतंय. ही लढाई लढण्यासाठी आपण तयार आहोत, असं रोहित पवार म्हणाले.

प्रत्येकानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केंद्रबिंदू ठेवला पाहिजे. जे कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं तर एक योग्य पद्धत तयार होईल. त्यातून चांगलं पक्षसंघटन तयार होईल. त्यामुळं हे नेते आहेत, ज्यांना वाटतं की त्यांच्यामुळंच पक्ष आहे, त्यांच्या जाण्यानं काही परिणाम होईल, असं वाटत नाही. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही बदल दिसून येतील, असंही पवार यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2009 मध्ये भाजपचे मोठे नेते बैलबंडीभर पुरावे घेऊन अधिवेशनात गेले होते. त्या बैलबंडीमध्ये पुरावे अद्यापही आपल्याला दिसले नाहीत. त्यामुळं भाजपचं ते सोयीचे राजकारण होतं. नेत्यांना अडचणीत पकडायचं आणि नंतर त्यांच्याशी ‘बिझनेस’ करायचा हा भाजपचा जुना राजकीय धंदा असल्याची टीकाही आमदार रोहित पवार यांनी केली. अजित पवार, सुनील तटकरे, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे यांचीही घराणेशाही आहे. त्यांनासुद्धा भाजपनं आपल्या पक्षात घेतलं. मग भाजपवाले कसं म्हणतात की, राष्ट्रवादीकडं घराणेशाही आहे. आपल्या मते भाजपकडं सर्वांत जास्त घराणेशाही आहे, अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रात जे अनाजीपंत आहेत, त्यांची विचारसरणी आपल्याला कधीही पटली नाही. पटणारही नाही. महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आपण या आधुनिक अनाजीपंतांच्या विचारसरणीच्या विरोधात लढा देत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT