Eknath Shinde and Rohit Pawar Sarkarnama
विदर्भ

Amravati : मध्य प्रदेशातील शिंदेंची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील शिंदे आता घाबरले असतील

Amar Ghatare

NCP On BJP : चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल असेच चित्र होते. परंतु भाजपने मतांचं विभाजन करण्यासाठी त्या त्या राज्यांमध्ये अनेक पक्षांना पडद्याआड खतपाणी घातलं. त्यामुळं त्यांनी विजय मिळविल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली.

युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आमदार पवार अमरावती येथे मुक्कामी आहे. मंगळवारी (ता. 5) त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सध्या पवार यांची युवा संघर्ष यात्रा विदर्भातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे.

आमदार पवार म्हणाले, मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) यांची भाजपनं केलेली अवस्था पाहता महाराष्ट्रातील शिंदे आता घाबरले असतील, असं नमूद करीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. अजित पवार यांनाही विचार करण्याची वेळ आली असेल. भाजपला लोकनेते व लोकांचे पक्ष चालत नाहीत. भाजप हा एक हुकुमशाहीवादी पक्ष आहे. 2014 पासून तर भाजपमध्ये मोदी-शाह म्हणतील तेच होते. फोडा आणि राज्य करा ही त्यांची रणनीती आहे. त्यामुळं ते देशभरात हेच करीत आहे. कोणत्याही राज्याची राजकीय परिस्थिती बघा किंवा कोणताही पक्ष बघा, त्याचा भाजपनंच सत्यानाश केलाय.

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना जी भीती वाटत आहे, ती खोटी नाही. 2014 नंतर जेव्हा जेव्हा लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात जातीय विष पेरण्याचं काम होत आहे. 2018 मध्ये भीमा कोरेगाव येथे दंगल झाली. त्याचे पडसाद पूर्ण राज्यात उमटले. तेव्हा कोणाची सत्ता होती हे तपासून घ्या. आता 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होत आहे. बरोबर निवडणुकीच्या एक वर्ष आधीपासून महाराष्ट्रात ओबीसी विरूद्ध मराठा हा वाद पेटवला जातोय. अचानक सोशल माध्यमांवरील पोस्टवरून दंगली होत आहेत. त्यामुळं जानेवारी 2024 मध्ये नागरीकांनी अधिक सतर्क राहायला हवं, असेही आमदार पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातील शिवसेना भाजपला आधीपासूनच संपवायची होती. बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत ते शक्य नव्हतं. त्यामुळं त्यांनी बाळासाहेब गेल्यावर आपलं लक्ष्य साधलं. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ही बाब लक्षात आल्यानंच ते महाविकास आघाडीसोबत आलेत. आता भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं राजकारण संपविण्यासाठी मोहिम सुरू केलीय. त्यात काही लोक गेले आहेत. परंतु भाजपसोबत जाऊन आपण मोठी चूक केलीय, हे सर्वांनाच कळेल. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल, असा दावाही आमदार रोहित पवार यांनी केला.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT