Eknath Shinde, OBC Kranti Morcha Sarkarnama
विदर्भ

OBC Kranti News : कुठल्या अटी मान्य करत सोडविले उपोषण? ओबीसी क्रांती मोर्चाला मुख्यमंत्र्यांवर संशय !

अभिजीत घोरमारे

Bhandara OBC Kranti Morcha News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना येथे १७ दिवसांपासून सुरू असलेले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा अखेर समारोप झाला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत उपोषण सोडवले; पण कुठल्या अटी मान्य केल्या, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काहीच माहिती दिली नाही. (The Shinde government has been questioned about the Maratha reservation)

एकनाथ शिंदे यांच्या त्या भूमिकेवर ओबीसी क्रांती मोर्चाला संशय आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी कुठल्या अटी मान्य केल्या हे आतापर्यंत स्पष्ट केले नाही. ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी मराठा आरक्षणावरून शिंदे सरकारला सवाल केलेला आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार आहेत का, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे मते यांनी म्हटले आहे.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल, तर ओबीसी (OBC) समाजाचे सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संजय मते यांच्याकडून देण्यात आला आहे. मते म्हणाले की, ६० ते ६५ टक्के संख्या असलेल्या राज्याच्या ओबीसी समाजाला सरकारने न्याय द्यावा, ही विनंती ओबीसी समाज करीत आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) घेतलेली भूमिका संशयास्पद वाटते.

मुख्यमंत्र्यांनी कुठल्या अटींवर उपोषण थांबविले, हे आतापर्यंत स्पष्ट केलेच नाही. कारण त्यांनी एका महिन्यात मराठ्यांना आरक्षण देणार असे म्हटले आहे. ते देण्यात आले नाही तर मग त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? हे मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath shinde) आधी स्पष्ट केले नाही. राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाला वेठीस धरलेले आहे. ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवायला कोणीच समोर येत नाही.

एक मराठा समाजाचे उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री जातात. मात्र, ओबीसी समाजाच्या आंदोलनाला साधा मंत्रीही भेट देत नाही. सरकारने ओबीसी समाजाला चर्चेसाठीसुद्धा बोलावले नाही, ही शोकांतिका आहे. राज्यात होतकरू मुख्यमंत्री आणि एक नव्हे तर दोन - दोन उपमुख्यमंत्री आहेत. ओबीसींकडे दुर्लक्ष केले जात आहे. ओबीसी समाजाला डावलून आता चालणार नाही.

आता ओबीसी समाज एकवटला आहे. राज्यातला ओबीसी समाज जागा झालेला आहे. आता अन्याय सहन करणार नाही. ही बाब राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात घ्यावी, असा इशारा संजय मते यांनी दिला. त्यामुळे मुळात मराठा आरक्षण आणि आरक्षण वाचविण्यासाठी पेटलेला ओबीसी समाज इतक्यात तरी शांत होईल, असे वाटत नाही.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT