Babanrao Taywade Sarkarnama
विदर्भ

Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी सरकारकडून नेमके काय हवे ते ठरवावे

प्रसन्न जकाते

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील वेळोवेळी भूमिका बदलत असतात. त्यांनी नक्की त्यांना सरकारकडून काय हवे ते एकदा ठरवून घ्यावे. ते दिशाभूल करीत असतात. रोज नवीन भूमिका प्रसारमाध्यम आणि सरकारपुढे मांडतात. नक्की त्यांना काय हवे, याचाच उलगडा होत नाही. यापूर्पी 16 टक्के आरक्षण त्यांनी मागितले. त्यानंतर 12-12 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. गायकवाड समितीने शिफारस करताना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, लेवा पाटीदार या जातींचा समावेश केला होता. ओबीसीतल्या सहा जाती ओबीसीत आधीपासूनच आहेत. या जाती मराठा समाजात गृहीत धरू नयेत, असे मत अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले.

डॉ. तायवाडे म्हणाले, शुक्रे समितीचा अहवाल बाहेर आल्यानंतर अभ्यास करून त्यावर बोलू. या अहवालात ओबीसीतील जाती असलेल्या जाती मराठा समाजात दाखविल्या असतील, तर त्याला विरोध करू. वेळ आली तर न्यायालयातही जाऊ. ओबीसीत असलेल्या जातींना मराठा समाजात दाखवून मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यात येत असेल तर त्याला आक्षेप असेल. वेळ पडली तर कायदेशीर लढाई लढावी लागेल, असे तायवाडे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्याचे सरकार सांगत आहे की, संविधानाचा अभ्यास करून कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देऊ. 20 आणि 21 रोजी होणाऱ्या अधिवेशनाकडे लक्ष आहे. 50 टक्क्यांच्यावर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचा विरोध नाही. ओबीसी समाजाचा निधी नेहमीच थांबलेला असतो. ओबीसी समाजावर वित्तमंत्र्यांनी नेहमीच अन्याय केला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा भावनिक झाला आहे. यातून आंदोलन होत आहे, पण त्यातून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होऊ नये, अशी अपेक्षा आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मराठा आंदोलनाचा त्रास व्हायला नको, अशी विनंती आहे, असे बबनराव तायवाडे म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने ओबीसी समाज सुरुवातीपासूनच आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गाचे नुकसान होणार नाही, अशीच मागणी आहे. ओबीसी प्रवर्गाला सुरुवातीपासूनच मोजके आरक्षण मिळाले आहे. आता त्यातही एखाद्या समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचे असल्याचे ठाम मत डॉ. तायवाडे यांनी पुन्हा एकदा नमूद केले. मनोज जरांगे पाटील आंदोलन सुरू झाल्यापासून आतापर्यंत सातत्याने आपल्या मागण्या आणि भूमिका बदलत आले आहेत. त्यामुळे त्यांनी कोणत्यातरी एखाद्या भूमिकेवर ठाम राहावे, असेही ते म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT