Narendra Modi, Mallikarjun Kharge, Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Patole on Modi : दलित असल्यामुळे मल्लिकार्जुन खरगेंना निमंत्रण नाही, नानांचा स्फोटक आरोप !

अभिजीत घोरमारे

Maratha - OBC Political News : आपला देश लोकशाहीचा देश आहे. काँग्रेसचे अध्यक्ष हे दलित समाजाचे असल्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांना ‘G 20’ शिखर परिषदेला बोलाविण्यात आले नसल्याचा स्फोटक आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. खरगे हे विरोधी पक्षनेते असूनसुद्धा त्यांना या परिषदेत आमंत्रित न करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचेही ते म्हणाले. (BJP is constantly trying to keep the backward classes away)

भाजप जातीयवादी पक्ष आहे आणि मागासवर्गीयांना दूर ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने करण्यात येत आहे. याचे दर्शन ‘G-20’ परिषदेतून दिसून येत असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला.

यात कमी होत की काय, म्हणून मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करण्याचे पाप भाजपप्रणीत सरकार करत आहे. आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये वाद निर्माण करून आपली राजकीय पोळी शेकण्याचं काम भाजप करत असल्याचा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी केला.

सत्ता द्या, आरक्षण आम्ही देऊ..

राज्यातील मराठा आरक्षण आणि ओबीसींचा (OBC) वाढता विरोध लक्षात घेता काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एक राजकीय डाव टाकला आहे. केन्द्र आणि राज्याच्या सत्तेची चाबी काँग्रेसला द्या, आम्ही ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण देऊ, अशी ऑफर नानांनी दिली आहे.

विशेष म्हणजे ही ऑफर त्यांनी यापूर्वीसुद्धा मराठा समाजाला दिली होती. ते भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील चारभाटी मंदिरात आज (ता. नऊ) दर्शनासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते. आरक्षणाचे सर्व मार्ग खुले आहेत. असे असताना भाजपला जमत नसेल तर त्यांनी देशातील आणि राज्यातील सत्ता काँग्रेसला द्यावी. ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण आम्ही मिळवून देऊ, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

केंद्र व राज्य सरकार जातिनिहाय जनगणनेच्या विरोधात असून यामुळे आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ओबीसी ही आग असून ओबीसींच्या आरक्षणाला हात लावण्याची हिंमत सरकारने करू नये. सरकारच जळून जाईल, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला.

मोदींची तुलना रावणाशी..

नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रावणाशी तुलना केली. रावण जेव्हा अत्याचार करायचा तेव्हा हसायचा. त्याचप्रमाणे मणिपूरमध्ये महिलांवर अन्याय, अत्याचाराच्या घटनांचा प्रश्न राहुल गांधी यांनी संसदेत मांडला होता, त्यावेळी या प्रश्नावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काहीच न बोलता हसत होते, असे नाना म्हणाले आहे. हीच खरी शोकांतिका असून महिलांवर प्रश्नावर मोदी रावणाप्रमाणे हसत असतील, तर याची चीड नक्कीच येणार आहे, असे ते म्हणाले.

भाजपची दोनदा सरकार मात्र, दाऊद काही आला नाही. वाघनखे भारतात आणणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. आधी या सरकारने विदेशातून चित्ते आणले होते. आता शिवाजी महाराजांचे वाघनखे आणण्याच्या गोष्टी करणे म्हणजे ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. दरम्यान त्यांनी २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले तर दाऊदला पकडून आणू, अशी घोषणा केली होती. मात्र दोनदा यांचे सरकार आले. पण दाऊदला हे आणू शकले नाही, असा टोला हाणला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT