Sharad Pawar at Desaiganj, Distp Gadchiroli
Sharad Pawar at Desaiganj, Distp Gadchiroli Sarkarnama
विदर्भ

आत्राम कुटुंबाला पवारांची मोठी भेट...

सरकारनामा ब्यूरो

गडचिरोली : सध्या धर्मरावबाबा आमदार आहेत. पण यापुढे धर्मरावबाबांना विधानसभेची तिकीट देणार नाही, असा निर्णय मी, प्रफुल्ल पटेल आणि प्रमुख नेत्यांनी घेतला असल्याचे सांगत शरद पवार यांनी देसाईगंज येथील कार्यकर्ता मेळाव्यात धर्मरावबाबांसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याला धक्का दिला. पण दुसऱ्याच वाक्यात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना विधानसभेची उमेदवारी देऊ आणि बाबांना लोकसभेत पाठवण्याचा मानस असल्याचे सांगत पवारांनी आत्राम कुटुंबाला आनंदाचा धक्का देत मोठी भेट दिली.

आज पवारांनी अहेरी विधानसभेची उमेदवारी भाग्यश्री धर्मराव आत्राम यांना जाहीर केली. सध्या या जागेवर धर्मराव आत्राम हे विद्यमान आमदार आहेत. भाग्यश्री या धर्मराव आत्राम यांच्या कन्या आहेत. धर्मराव आत्राम यांना बढती देऊन लोकसभेत पाठवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची मागणी काँग्रेसकडे करू, अशी माहिती शरद पवार यांनी भाषणात दिली. यावेळी पवार म्हणाले, भाग्यश्री अध्यक्ष असताना त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगले काम केले. सर्वसामान्य कुटुंबांतील महिलांना उमेदवारी देऊन निवडून आणायचे काम तुम्ही करा आणि आपल्या भगिनी उत्तम काम करतात याचा आदर्श पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून देशासमोर ठेवा.

मंचावर खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी खासदार सुबोध मोहिते, भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेले नाना नाकाडे, आमदार भुरे, आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार मधुकरराव कुकडे, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार राजेंद्र जैन होते.

धर्मरावबाबांनी माझा एक प्रश्‍न सोडविला, तो म्हणजे त्यांना लोकसभेत पाठवण्याचा. मी बाबांशी बोललो नाही, पण प्रमुख लोकांशी बोललो आणि ठरवलं की तुम्हाला यापुढे विधानसभेचे तिकीट द्यायचे नाही. हे तिकीट भाग्यश्रीला द्यायचे. आज राज्यात आघाडी सरकार आहे. त्या आघाडी सरकारसोबत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढावी, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. निर्णय होईल तेव्हा होईल, तुम्ही आत्तापासून संपर्क वाढवा. कारण आपल्याला भाग्यश्रीला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचे आहे, असे पवारांनी सांगितले.

आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाला त्याच्या संख्येप्रमाणे जागा मिळाल्या पाहिजे. तिसरी जागा धर्मरावबाबांना द्यायची आमची इच्छा आहे. त्यांना या विभागाचे प्रतिनिधित्व द्यावे, ही आमची इच्छा होती. तेव्हा आम्ही ते करू शकलो नाही, ते दुःख माझ्या मनात आजही आहे. पण दे दुःख दूर करायचे आहे. म्हणजे आता धर्मरावबाबांना लोकसभेवर पाठवायचे आहे आणि भाग्यश्रीने जिल्हा परिषदेमध्ये चांगले काम केल्यामुळे त्या अनुभवाचा फायदा त्यांना विधानसभेत घ्यायची संधी द्यायची आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ पाहिजे, अशी साद पवारांनी आदिवासी जनतेला घातली. भाजपच्या माजी आमदार इंदू नाकाडे यांचे चिरंजीव नाना नाकाडे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला त्यांचे स्वागत करतो. त्यांना संघटनेत काम करण्याची संधी देत आहो. यामुळे राष्ट्रवादीला उत्तर गडचिरोलीत विशेष करून आरमोरी विधानसभा क्षेत्रात पक्षाला फायदा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT