Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : 'वंचित' एकटी लढली तर भाजपविरुद्ध अटीतटीचा सामना होणार

प्रसन्न जकाते

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी सोबत राहून लेाकसभा निवडणूक लढले तर 40 जागा जिंकू शकतात. मात्र आघाडी झाली नाही आणि वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढण्यास सहा जागा जिंकू शकते. एकंदरीत परिस्थिती पाहिल्यास आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होईल अशी परिस्थिती आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी भाष्य केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकटे लढलो तर राज्यात भाजप विरुद्ध वंचित अशी थेट लढत आहे. अशा लढतीत कोणाचे किती उमेदवार पडतील हे सांगणे अवघड आहे. यापेक्षा पडझड किती कमी करण्याचा प्रयत्न करता येईल हा भाग महत्वाचा आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने महाविकास आघाडीला माहिती देण्यात आली होती. ‘वंचित’ कोणत्या जागेबद्दल आग्रही आहे त्याची. काही सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ओबीसीचे 15 उमेदवार असावे, तीन उमेदवार अल्पसंख्यांक समाजातील असावे. तिसरा मुद्दा ही अट नाही. मात्र सेक्युलर मतदाराला आश्वासित करण्यासाठी महाविकास आघाडीतील काही घटक पक्षाचा इतिहास लक्षात घेता आम्ही भाजप सोबत जाणार नाही असे आश्वासित करावे, असे आंबेडकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीतील पक्ष सोडून जाणार नाही याबाबत शक्य असेल तर त्याचा एक लेखी मसुदा युती झाल्यावर जाहीर करावा, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला केली आहे. सेक्युलर मतदारांना वाटेल की, माझे मत हे सेक्युलर पार्टीलाच जाईल याची खात्री त्यांना होईल. आता महाविकास आघाडी काय भूमिका घेते, यावर लक्ष असल्याचे आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात सहभागी होऊ नका, यावर बोलताना आंबेडकर म्हणाले, की पक्षातील कार्यकर्ते उत्साही असतात. उत्साही असले की आमच्या पक्षात भांडण लागू नये आणि आमची डोकेदुखी वाढू नये, म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना आपण आवाहन केल्याचे आंबेडकर म्हणाले. युती म्हटल्यावर जातात, वादावादी सुरू होते. मिटविण्यासाठी डोकेदुखी होते, असेही अकोला येथे बोलताना आंबेडकर म्हणाले.

‘मला माहिती नाही की, महाविकास आघाडीत सहा तारखेला वाद मिटेल की नाही.’ मिळालेल्या माहितीनुसार कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात 15 जागांवरून वाद आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात नऊ जागांवरून मतभेद आहेत. मात्र हा वाद जर सहा तारखेपर्यंत मिटणार असेल तर स्वागतार्हच आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप हे एकत्र होते. भाजप 23 जागांवर लढत होती. उर्वरित जागांवर शिवसेना लढली. ज्या जागांवर शिवसेना लढली नाही तसेच 2004 पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत आहेत, त्यांचा समझोता आणि ‘सिट शेयरिंग फॉर्म्युला’ होता. त्यामुळे यांच्या युती, आघाडी असताना ज्या मतदारसंघात हे लढले नाहीत त्यामध्ये यांचा प्रभाव कमी आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

मतदारसंघांमधील ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ‘सेटलमेंट’ करावे, असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे, असेही आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीत जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या गेल्या तीन बैठकीत वंचित बहुजन आघाडी सहभागी झाली. मात्र ‘वंचित’ घटक आहे की नाही हा संभ्रम आम्हालाही असल्याचा टोला आंबेडकर यांनी तीनही पक्षांना यावेळी लगावला. आम्ही महाविकास आघाडीतील निमंत्रक आहोत की, घटक पक्ष संभ्रम कायम असल्याचे ते म्हणाले. राज्यात वंचित बहुजन आघाडीकडून केवळ आपली उमेदवारी जाहीर आहे.

आघाडीबाबत बोलणी होण्याअगोदर ही उमेवादी जाहीर केली आहे. वर्ध्याची जागा जाहीर झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. वर्धाबाबत ‘वंचित’कडून लिहिलेल्या पत्रात नाव सुचविण्यात आले आहे. जिल्हा कमिटीला अधिकार आहे, पक्ष अध्यक्षांना उमेदवार सांगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ ‘वंचित’ची एकच जागा जाहीर झाली आहे. आपण अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे आंबेडकर पुन्हा एकदा म्हणाले. आपण मोदींच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी अकोल्यात येऊन लढावे असेही एका प्रश्नावर बोलताना आंबेडकर म्हणाले. मुंबईत येत्या सात तारखेला ईव्हीएम मशिम संदर्भात एक ‘डेमोस्ट्रेशन’ होणार आहे. त्यानंतर आपली भूमिका जाहीर करू असेही आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीच्या होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण आपल्याला नाही. मात्र शरद पवार यांच्या भेटीचे निमंत्रण आहे. त्यांना भेटणार आहे. याबाबत त्यांना होकार दिला आहे. भेट कुठे होणार हे सांगता येणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT