Neelan Gorhe and Prvin Darekar
Neelan Gorhe and Prvin Darekar 
विदर्भ

Pravin Darekar : प्रवीण दरेकर लवकरच होणार मंत्री, निलम गोऱ्हेंनी मारला टोमणा !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Legislative Council News : राज्यातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांच्या दुरवस्थेबद्दल विधानपरिषदेत सदस्यांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. प्राथमिक सुविधाही तेथे मिळत नसल्याचा आरोप आमदारांनी केला. गृहपालांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या असून दोषी पाच गृहपालांना निलंबित करण्यात आल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

यासंदर्भात सभागृहात प्रश्‍नोत्तराच्या तासात मंत्री संजय राठोड उत्तर देत असताना प्रवीण दरेकर मध्ये प्रश्‍न विचारण्याचा प्रयत्न करीत होते. सभापती निलम गोऱ्हे यांनी मनाई केल्यानंतरही दरेकरांनी तसा प्रयत्न केला. तेव्हा तुम्ही आता विरोधी पक्ष नेते नाहीत आणि लवकरच मंत्री होणार आहात. त्यामुळे असं कशाला करता, असा प्रश्‍न निलम गोऱ्हे यांनी त्यांना केला. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

सभापतींच्या उत्तराने प्रवीण दरेकर (Pravin Darekar) मंत्री होणार, हे निश्‍चित झाले. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात दरेकरांची वर्णी लागणार, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहेच. त्यावर निलम गोऱ्हेंच्या आजच्या वक्तव्याने शिक्कामोर्तब झाले, असे म्हणायला काहीच हरकत नाही. कामकाज पुढे सरकल्यावर राज्यात समाजकल्याण विभागामार्फत ४४१ वसतिगृह चालवले जातात. त्यामध्ये सर्व सुविधा दिल्या जातात. आत्तापर्यंत ५४ वसतिगृहांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी ४९ वसतिगृहांमध्ये तक्रारीनुसार बाबी आढळल्या, असे मंत्री राठोड यांनी सभागृहाला सांगितले.

संशयास्पद गृहपालांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या. ते हजर राहात नाही, विद्यार्थ्यांना जेवण वेळेवर मिळत नाही. संगणक कक्ष आणि पिण्याच्या पाण्याचा आरओ बंद होता. या तक्रारींची चौकशी केली. २८ गृहपालांवर विभागीय चौकशी सुरू केली आहे. पाच गृहपालांना निलंबित केले आहे. रॅंडम तपासणी करण्यात येईल. याशिवाय अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याचे नियोजन केले असल्याचे राठोड यांनी सांगितले.

मंत्री राठोड (Sanjay Rathod) यांचे उत्तर बरोबर आहे. पण ४४१ वसतिगृहांची दुरवस्था झाली आहे. पिण्याचे पाणी नाही, जेवण नाही, पाणी गळते, टेबल तुटलेले आहेत. ही दुरुस्ती केव्हा करणार. याशिवाय वरळीच्या वसतिगृहावर अतिक्रमण झाले. विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या तर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावर कारवाई केव्हा, असे अभिजित वंजारी यांनी विचारले असता त्यावर वरळी बीडीडीची चौकशी करण्यात येईल. ज्या मुलांनी अर्ज केला. पण नंबर लागला नाही त्यांच्यासाठी स्वाधार योजना आहे, असे उत्तर देण्यात आले.

निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी इन्टर्न विद्यार्थ्यांची समस्या मांडली. त्यांच्यासाठी वसतिगृह उपलब्ध नाहीत. वाढीव वसतिगृह करणार का, असे विचारले. तर ५४ वसतिगृहांची तपासणी केली असता ४९मध्ये अनियमितता दिसल्याचे मंत्र्यांनी सांगितले. ४४१ मध्ये तपासणी केली असती, तर ४०० गृहपालांवर कारवाई करण्याची वेळ आली असती, असे अनिकेत तटकरे (Aniket Tarkare) म्हणाले. यावर ज्या सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केले त्या सर्वांसोबत लवकरच बैठक घेतली जाईल, असे संजय राठोड म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT