Rahul Gandhi with OBC
Rahul Gandhi with OBC Sarkarnama
विदर्भ

Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले, ओबीसी जनता या देशाचा कणा आहे...

Atul Mehere

नागपूर : मनुस्मृती म्हणतो, शूद्र पायातून जन्मले. पण मी म्हणतो, ओबीसी वर्ग हा उत्पादक असून या देशाचा कणा आहे. कणा मजबूत नसेल तर शरीर कोसळून जाईल. त्यामुळे या वर्गाने मजबुतीने व एकजुटीने पुढे येणे गरजेचे आहे, असे कॉंग्रेस (Congress) नेते खासदार राहुल गांधी म्हणाले.

खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत काढलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाल्याच्या १४व्या दिवशी १९ नोव्हेंबरला जळंब (ता. शेगाव) येथे दुपारी दोन वाजताच्या सुमारास दलित आणि ओबीसी (OBC) यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राहुल गांधी सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ते बोलत होते. या बैठकीत ओबीसी प्रतिनिधी मंडळात ओबीसी अभ्यासक डॉ. लता प्रतिभा मधुकर, प्रदेश सरचिटणीस राम वाडिभस्मे व शरद वानखेडे यांनी आपले मुद्दे राहुल गांधींसमोर ठेवले. तर दलित प्रतिनिधी मंडळात रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे आणि चेतन शिंदे याचा समावेश होता.

डॉ. लता प्रतिभा मधुकर म्हणाल्या, बाहेर अनेक लोक ओबीसींबद्दल अजून काहीच भूमिका घेत नाही, मंडल आयोगाच्या पूर्ण शिफारशी लागू करण्यात आल्या पाहिजे. १६ नोव्हेंबरला नोकरीतील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल (इंदिरा साहनी) येऊन ३० वर्ष झालीत. मात्र ओबीसींचा नोकरीतील अनुशेष पूर्णपणे भरलेला नसून फक्त १९ टक्केच ओबीसी नोकरीमध्ये आहेत. नॉन क्रिमिलेअरची मर्यादा तीन वर्षांपासून वाढलेली नसून ती वाढायला हवी व तिची मर्यादा २० लाखाच्या पुढे हवी. मंडल आयोगाच्या शिफारशींनुसार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती व्हावी. शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा दीड लाख रुपयांवरून वाढायला हवी. उच्च शिक्षणात वर्ष २०१५-१६ पेक्षा २०१९-२० मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. परंतु प्राध्यापकांचा अनुशेष अजूनही रिक्त असल्याचे मुद्दे उपस्थित केले. राम वाडिभस्मे यांनी उपस्थित केले. तर जातिनिहाय जनगणनेची मागणी करत काँग्रेस सरकारच्या काळात हा विषय मार्गी निघावा. केंद्रातसुद्धा ओबीसी मंत्रालयाची स्थापना व्हावी अशी मागणी शरद वानखेडे यांनी केली.

जातिनिहाय जनगणनेच्या संदर्भात राहुल गांधी म्हणाले, मी प्रधानमंत्री होण्याची वाट कशाला बघता? ती करण्यासाठी या सरकारवर दबाव टाका आणि केली नाही तर तुम्ही असे सरकार निवडणार आहात का, अजून दहा वर्षांसाठी. जातीवार जनगणना झालीच पाहिजेस अशीच माझी भूमिका आहे आणि सर्व उत्पादकांनी स्वतःची उत्पादने यावर मालकी प्रस्थापित केली पाहिजे आणि आपल्या कामाचा सन्मान करायला हवा.

हिंदुत्ववादी सरकार ओबीसीचे लक्ष, स्वतःच्या सन्मानाने जगण्याच्या प्रश्नावरून वळवत आहे. तुम्ही आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढू नये म्हणून कधी हिंदू-मुस्लिम तर कधी रामाला ते समोर करतात. मुख्य मुद्यांवरून भटकवण्याचे प्रयत्न करतात, असेही राहुल गांधी म्हणाले. या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT