ravi rana bacchu kadu sarkarnama
विदर्भ

Video Ravi Rana Vs Bacchu Kadu : बच्चू कडू 'ब्लॅकमेलर' नंबर वन; पत्नीच्या पराभवानं 'घायाळ' रवी राणांनी सगळंच काढलं

Akshay Sabale

बच्चू कडू यांचा उमेदवार मागे घेण्यासाठी माझ्यासोबत तोडपाणी करण्यात आली. मला काय मागितलं, कशापद्धतीनं दिनेश बूब यांना उभे करण्यात आलं, त्यासाठी कुठून-कुठून वसुली केली, कुठून पैसे आले याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे, असं म्हणत आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

अमरावतीत तिहेरी लढत झाली. यात काँग्रेसचे बळवंत वानखेडे ( Balwant Wankhede ) यांनी 5 लाख 20 हजार 149 मते घेत विजय मिळवला. त्यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा ( Navneet Rana ) यांचा 18 हजार 495 मतांनी पराभव केला. राणा यांना 5 लाख 1 हजार 654 मते मिळाली. तर, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दिशेन बूब यांनी 84 हजार 985 मते घेऊन राणांच्या विजयाचे समीकरण बिघडवले.

हाच पराभव रवी राणांच्या ( Ravi Rana ) जिव्हारी लागला आहे. नवनीत राणांच्या पराभवानंतर पहिल्यांदाच भाष्य करत रवी राणांनी बच्चू कडूंवर 'प्रहार' केला आहे. निवडणुकीत दिनेश बूब यांची अनामत रक्कम जप्त होते. याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असा खोचक सल्ला राणांनी कडूंना दिला आहे.

रवी राणा म्हणाले, "आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जिल्ह्याच्या विकासाचा घात करण्यात आला. याचा हिशोब अचलपूरमधील जनता नक्की घेणार आहे. पाच वर्षे विकासाची कामे खेचून आणले, जिल्ह्यात मोठे प्रकल्प आणले. काही महिन्यांत एअरपोर्ट सुरू होईल. संपूर्ण जिल्ह्याचं नावं उंचवण्याचं काम राणांनी संसदेत केलं आहे. नवनीत यांनी शेतकरी, मजूर यांचा आवाज उठवला. तरीही पराभव झाला. हा आमच्यासाठी चिंतनाचा विषय आहे. चिंतन करून पुन्हा लढाईत उतरणार आहोत."

"महाराष्ट्रात तोडपाणी, ब्लॅकमेलिंग करून वसुली करण्यात कडूंचा ( bacchu Kadu ) एक नंबर आहे. ज्या ताटात खातात, त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम कडूंनी केल आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद भोगून कडू खोक्यासाठी बाहेर पडले. विधानसभेला कडूंनी 20 जागा लढविण्याची घोषणा करून महायुतीला ब्लॅकमेंलिंग करण्याचं काम सुरू केलं आहे," अशी टीका राणांनी केली आहे.

"नवनीत राणांना पाडण्यासाठी अमरावतीत कडूंनी उमेदवार उभा केला होता. ना जिल्ह्याच्या विकासाचा, भविष्याचा आणि शेतकऱ्यांच्या त्यांनी विचार केला. मी शेतकऱ्यांसाठी चार-चार वेळा तुरुंगात गेलो होतो. कडू शेतकऱ्यांसाठी एक रात्र तुरुंगात घालविल्याचं दाखवावं. त्यांचं आंदोलन म्हणजे फक्त तोडपाणी करणं. या सगळ्या तोडपाणीचा हिशोब अचलपूरमधील जनता घेणार," असा इशारा राणांनी कडूंना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT