Ravikant Tupkar in Public Meeting. Sarkarnama
विदर्भ

Buldhana : सरकारला आता शेतकऱ्यांचा इंगा दाखवणार, विधान भवनावरच धडक देणार

जयेश विनायकराव गावंडे

Farmer Issue : सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या शब्द न पाळल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा संतापले आहेत. गुरुवारी (ता. 19) डिसेंबरला ते नागपूर हिवाळी अधिवेशावर हल्लाबोल करणार आहेत. शेतकऱ्यांचा इंगा काय असतो, ते आता सरकारला दाखवून देऊ, असा इशारा तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्यातील सोमठाणा येथे बैठकीत दिला.

येलो मोझॅक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी 100 टक्के नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, पिकविम्याची 100 टक्के अंतिम रक्कम तात्काळ मिळावी आदीमागण्यांसाठी तुपकरांच्या नेतृत्वात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. 5 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात एल्गार यात्रा काढण्यात आली. 20 नोव्हेंबरला बुलढाण्यात भव्य मोर्चा निघाला. त्यानंतर तुपकरांना पोलिसांनी अटक केली होती.

न्यायालयाने मुक्त केल्यानंतर आपले मूळ गाव सोमठाणा येथे त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं. अन्नत्याग आंदोलन सुरू असतानाच त्यांनी हजारो शेतकऱ्यांसह मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी मुंबईत धडक दिली. त्यामुळे राज्य सरकारने 29 नोव्हेंबरला शेतकऱ्यांशी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. सोयाबीन-कापूस दरवाढीसंदर्भात केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा 9 डिसेंबरला मुंबईत बैठक घेतली.

काही मुद्द्यांवर सरकार सकारात्मक असल्याचे बैठकीत केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले. मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला 15 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत सरकारने अंमलबजावणीस सुरुवात न केल्याने तुपकर पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यामुळं त्यांनी सोमठाणा येथे शेतकऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवनावर धडक देण्याचे निश्चित करण्यात आलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठकीत ठरल्यानुसार 18 डिसेंबरला समृद्धी महामार्गावर असलेल्या मेहकर जवळील फर्दापूर टोल नाक्यापासून शेतकरी नागपूरच्या दिशेने रवाना होतील. गुरुवारी ते विधान भवनावर धडकतील. या मोर्चासाठी शनिवारपासूनच (ता. 16) तयारीला सुरुवात झालीय.

गावागावातून शेतकऱ्यांची फौज नागपूरकडं रवाना होणार आहे. त्यामुळं हे आंदोलन उग्र स्वरूपाचं होण्याचे संकेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत आता माघार घेणार नाही, असं तुपकर यांनी यावेळी सांगितलं. तुपकर यांच्या या नव्या इशाऱ्यामुळं आता शासन आणि पोलिसांनी डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर तुपकर सध्या जामिनावर मुक्त आहेत. अशात पोलिस त्यांना वारंवार अटक करू शकत नाही, अशी अधिकाऱ्यांची कायदेशीर अडचण आहे. अशात सरकारही शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कार्यवाही करीत नसल्यानं तुपकर सतत आक्रमक होत आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT