Mohan Prakash, Congress.
Mohan Prakash, Congress. Sarkarnama
विदर्भ

RSS : अदानी धोरण ठरवतात, भागवत मान्यता देतात आणि मोदी अंमलबजावणी करतात !

सरकारनामा ब्यूरो

Congress's Mohan Prakash News : एलआयसी आणि बॅंकांचे कोट्यवधी रुपये अदानीने लुटले आणि आपले सरकार त्याला देशभक्त म्हणत आहेत. देशाची संपत्ती लुटणारा अदानी देशभक्त कसा, असा सवाल कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी केला.

नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, भाजप प्रणीत नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात आले, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धोरण ठरवते आणि त्यांची अंमलबजावणी मोदी सरकार करते, असे वाटत होते. परंतु आता वेगळेच चित्र समोर आले आहे. उद्योजक गौतम अदानी धोरण ठरवतात, मोदी त्याची अंमलबजावणी करतात आणि आरएसएस प्रमुख डॉ. मोहन भागवत त्याला प्रमाणित करतात.

पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जातात ते अदानी यांचे एजन्ट बनून. हे देशाची मान शरमेने खाली घालवणारी बाब आहे. देशात एवढे उद्योजक आहेत, पण ते अदानीला मदत करतात. कारण, मोदी आधी अदानीच्या विमानाने फिरत होते. अदानी त्यांना गुजरातमध्ये मदत करीत होते. आता त्याची परतफेड म्हणून मोदी त्यांना परदेश दौऱ्यावर घेऊन जातात. सगळ्या क्षेत्रात अदानीसाठी नियमांची मोडतोड केली जाते.

एलआयसी आणि बँकेतून कोट्यवधी रुपये त्यांना व्यवसाय करण्यासाठी दिले गेले. अशाप्रकारे जनतेचा पैसा आणि देशाची संपत्ती लुटणारा अदानी देशभक्त असा सवाल मोहन प्रकाश यांनी संघ प्रमुख डॉ. मोहन भागवत यांना विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक विदेशी दौऱ्यात गौतम अदानी यांना कशाला घेऊन गेले, प्रत्येक मोठे कंत्राट त्यांनाच कसे मिळत होते, असे प्रश्न उपस्थित करून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी मोदी आणि अदानी यांची व्यावसायिक भागीदारी असल्याचा खळबळजनक आरोप आज केला.

यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भूमिकेवरही शंका व्यक्त केली. मोहन प्रकाश म्हणाले, पूर्वी आम्हाला वाटायचे भाजपचे सर्व ध्येय-धोरणे रेशीमबागेतून ठरतात. मात्र मोदी यांनी त्यास छेद दिला. गौतम अदानी धोरण ठरवत होते आणि मोदी त्याची अंमलबाजवणी करीत होते. सरसंघचालक यांनीही आजवर यावर कधीच आक्षेप घेतला नाही किंवा भाष्यसुद्धा केले नाही. तेसुद्धा यात वाटेकरी होते, याचे उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली. मोदी आणि अदानी यांनी मागील पाच ते सात वर्षांत एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एलआयसीचा पैसा अदानी यांना वापरण्यास दिला.

आता अदानीचे शेअर कोसळल्याने तब्बल ४४ हजार कोटी रुपयांचे एलआयसीचे नुकसान झाले आहे. प्रत्येक कंत्राट मिळाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे अदानीस कर्ज दिले जात होते. एवढेच नव्हे तर विदेशातील उद्योगांकरिता बँक हमी दिली जात होती. अदानींचे घोटाळे बाहेर आल्यानंतर जनतेच्या कोट्यवधी रुपयांची लूट झाली असल्याचे प्रकाश यांनी सांगितले. संसदेत प्रश्न विचारण्याचा प्रत्येक लोकप्रतिनिधीला अधिकार आहे. सत्ताधाऱ्यांनी त्याचे उत्तर देणे अपेक्षित आहे. मात्र येथे प्रश्‍नच विचारू दिले जात नाही.

प्रश्‍न विचारले तर तपास यंत्रणांची भीती दाखविली जाते. इतक्या मोठ्या घोटाळ्याची चौकशीची मागणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली, त्यात काय गैर आहे. हेच काँग्रेसच्या (Congress) कार्यकाळात झाले असते तर भाजपचे नेते चूप बसले असते का, अशीही विचारणा मोहन प्रकाश यांनी केली. पत्रकार परिषदेला शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, कमलेश समर्थ, संदेश सिंगलकर, उमाकांत आग्निहोत्री, प्रशांत धवड, संजय महाकाळाकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

आता भाजप सत्तेवर येणार नाही..

ज्या सार्वजनिक उपक्रमांचे भाजप सरकारने (BJP Government) नियम व अटी व शर्ती डावलून खासगीकरण केले असेल, असे सर्व करार काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यावर रद्द केले जातील. तसेही २०२४ च्या निवडणुकीत भाजप सत्तेवर येणार नाही, असाही दावा यावेळी मोहन प्रकाश यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT