Narendra Modi Mohan Bhagwat sarkarnama
विदर्भ

Mohan Bhagwat : "पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते तेव्हा..." : मोहन भागवत यांचं सूचक विधान; PM मोदींना थांबण्याचा सल्ला?

Mohan Bhagwat statement : गृहमंत्री अमित शहा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही उमेदवाराला तिकीट न देण्याचा पर्याय निवडल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे मोहन भागवतांनी केलेलं वक्तव्य नेमकं कोणाला उद्देशून होतं याबाबतच्या तर्कवितर्क लावले जात आहेत.

Jagdish Patil

Nagpur News, 10 Jul : 'जेव्हा 'पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो', असं सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षांचे होत आहेत. त्यामुळे भागवत यांनी मोदी यांनाच उद्देशून हे विधान केले आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

ते नागपूरमध्ये 'मोरोपंत पिंगळे: द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जर' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. वयाच्या पंच्याहत्तरीनंतर माणसाने बाजूला होऊन इतरांना संधी दिली पाहिजे, असा संघ कार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिल्याची आठवण त्यावेळी मोहन भागवत यांनी करून दिली.

मोरोपंत पिंगळे यांची एक आठवण सांगताना ते म्हणाले, "मोरोपंत पिंगळे एकदा म्हणाले होते की, जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, तुमचं वय झालं आहे. आता जरा बाजूला सरा, आम्हाला ही करू द्या. " भागवत यांनी पिंगळे यांच्या जीवनातील एक किस्सा सांगितला असता तरीही आता अनेकांनी या वक्तव्याला सध्याच्या राजकारणाशी जोडलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था असून अनेकदा संघ भाजपला सल्ला देत असतो. अनेकदा सरकार चुकलं तर सरकारच्या कार्यप्रणालीवर भागवत यांनी परखड टीका देखील केली आहे. त्यामुळे संघचालकांचं वक्तव्य सहाजिकचं राजकारणाशी देखील जोडलं जातं. शिवाय भागवत यांनी ज्या वयाचा उल्लेख केला आहे. त्याचा यापूर्वीच भाजपच्या कार्यप्रणालीत उल्लेख आहे. 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या उमेदवारांना तिकीट नाही, असं धोरण भाजपमध्ये अनेक वर्षांपासून लागू आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही उमेदवाराला तिकीट न देण्याचा पर्याय निवडल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे मोहन भागवतांनी केलेलं वक्तव्य नेमकं कोणाला उद्देशून होतं याबाबतच्या तर्कवितर्क लावले जात आहेत. एकीकडे भागवत यांनी 75 वर्षानंतर थांबायचं असतं असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा 75 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यामुळे भाजपच्या नियमानुसार पंच्याहत्तरीची राजकारणातून बाजूला होण्याचा सल्लाच भागवत यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदींना दिला का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयावरून मोठे वादळ उठले होते. विरोधकांनी मोदी यांच्या वयाचा मुद्दा पुढे करून ते 75 वर्षांचे झाल्यानंतर निवृत्ती घेणार का? की भाजप मोदींसाठी स्वतःच बनवलेला नियम तोडणार? असा सवाल विचारला होता. अशात आता मोहन भागवत यांनी 75 वर्षांचा दाखला देत पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो', असं सूचक वक्तव्य केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT