Ghatanji APMC Yavatmal. Sarkarnama
विदर्भ

Yavatmal : घाटंजी बाजार समितीत लिलाव बंद पाडण्याचा राजकीय डाव उधळला

सतीश हरिश्चंद्र येटरे

Ghatanji News : घाटंजी कृषी उत्पन्र बाजार समितीमध्ये सुरू असलेला कापसाचा लिलाव सोमवारी (ता. 18) विरोधी पक्षातील काही संचालकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी संचालकांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू झालीय. बाजार समितीत विक्रमी खरेदी सुरू असल्याने ‘सेस’च्या माध्यमातून उत्पन्न वाढणार आहे. नेमकाच हाच विषय विरोधकांना खुपल्याने त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता कापूस बाजार समितीत आणावा असे संचालक मंडळाने स्पष्ट केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 12 वर्षांपासून सत्तेत असलेल्या संचालक मंडळाचा यावर्षी झालेल्या एपीएमसी निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याने पराभूत संचालक मंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात कटकारस्थानं करणं सुरू केल्याचा आरोप आहे. अशातच सोमवारी दुपारी 11 काही विरोधकांनी शेतकऱ्यांना सोबत घेत लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

विरोधक गोंधळ घालणार ही बाब आधीच सत्ताधारी संचालक मंडळाला माहिती होती. त्यामुळं सत्ताधारी संचालक सतर्क होते. त्यांनी आधीच घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार नीलेश सुरडकर यांना सूचना दिली होती. त्यामुळं बाजार समितीच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होत. विरोधकांनी गोंधळ घालणं सुरू करताच सत्ताधारी संचालक मंडळाने पोलिसांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

बाजार समितीचे नवीन संचालक मंडळ कापसाला 12 हजार 500 आणि सोयाबीनला 8 हजार 500 रुपये भाव मिळावा यासाठी विशेष आग्रही आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे ते मागणी करणार आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हर्रास समिती स्थापन करण्यात आलीय. भाव कमी दिला जात असल्यास किंवा काही तक्रार असल्यास समितीसोबत संवाद साधण्याचे आवाहन करण्यात आलेय. अशातच विरोधी पक्षातील संचालकांनी गोंधळाचे षडयंत्र रचले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाजार समितीचे सभापती नितीन कोठारी, उपसभापती सचिन सुभाष देशमुख, संचालक संजय गोडे, चंद्रप्रकाश खरतडे, नंदुकुमार डंभारे, चंदु पाटील इंगळे, हनुमंत मेश्राम, शुभांगी जिरापुरे, सवित काळे, देवकी रामधन जाधव यांनी सतर्कता बाळगत कापूस लिलाव सुरळीत केला. साहेबराव पवार, रणजित जाधव, सय्यद शब्बू, भारत पोतराजे या शेतकऱ्यांनीही बाजार समितीमध्ये घडलेल्या प्रकाराचा निषेध करीत शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीमध्ये आणावा असे आवाहन केले.

घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीत लवकरच सीसीआयची कापूस खरेदी सुरू होत आहे. सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर कागदपत्रांची पूर्तता व नोंदणी करून तेथेही आपला कापूस शेतकऱ्यांना विकता येणार आहे. बाजार समितीत सत्तेवर आल्यानंतर अनेक चांगले निर्णय घेण्यात आलेत. त्यामुळे कटकारस्थान करण्यात येत असल्याचं सभापती नितीन कोठारी यांनी सांगितलं.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT