Government Saree in Yavatmal Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Government: रेशन दुकानातून महिलांना फाटक्या साड्या

सतीश हरिश्चंद्र येटरे

Maharashtra Government : सरकारी विभागाच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत प्रत्येक अंत्योदय लाभार्थ्याला मार्च महिन्यात साड्यांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, या साड्या फाटक्या आणि निकृष्ट दर्जाच्या आल्याने सरकारने गरिबांची थट्टा चालविल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग संचालनालयाने राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना साडीवाटपाचा निर्णय मोठा गाजावाजा करीत घेतला आहे. राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना वर्षातून एकदा साडीवाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्य यंत्रमाग महामंडळ ही योजना राबवित आहे. या योजनेसाठी राज्य सरकार महामंडळाला साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, साठवणूक, हमालीसाठी खर्च देणार आहे. 2023-24 वर्षासाठी महामंडळास एका साडीसाठी 355 रुपये दिले आहेत. नुकताच या योजनेचा शुभारंभ यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात 86 रेशन दुकानांतून करण्यात आला. यात अंत्योदय योजनेच्या 7 हजार 342 लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, यात अनेक साड्या फाटक्या व जीर्ण अवस्थेत आहेत. अगदी टाकाऊ स्वरूपाच्या या साड्या आहेत. हीच का मोदींची गॅरंटी, अशा भावना यामुळे महिला व्यक्त करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कापड फाटके असल्याने महिला रास्त दुकानातून साडी घेताना दुकानदाराशी वाद घालून साडी घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि जनता यामध्ये रास्त दुकानदार कात्रीत सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फाटक्या व जीर्ण साड्या मिळालेल्यांना विचारणा केली असता, ती स्वीकारणार तरी कशी? असा प्रश्न महिला उपस्थित करीत आहेत. रेशन दुकानदाराकडून देण्यात आलेली साडी फाटकी व जीर्ण अवस्थेत आहे. सरकारने गरिबांची चालवलेली ही थट्टा बंद करावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी व्यक्त केली गरिबांचे नाव समोर करून सरकार डोळ्यात धूळफेक करीत आहे. साड्यावाटप हा भ्रष्टाचाराचा कळस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरकारने साड्यावाटपाची ही योजना पुढील पाच वर्षांसाठी लागू केली आहे. सणाच्या काळात महिलांना या साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, योजनेच्या पहिल्याच वर्षी जीर्ण व फाटक्या साड्या आल्याने ही योजना टिकेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जीर्ण आणि फाटक्या साड्या सरकारने वाटणे बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी आपल्या तक्रारीत दिला आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT