Todgatta Village In Gadchiroli Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli News तोडगट्टाजवळ पोलिसांना घेरल्यानंतर संपूर्ण एटापल्लीत दोन आठवड्यांसाठी कलम १४४ लागू

प्रसन्न जकाते

Provocation By Tribal Leader's : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील तोडगट्टा येथे गेल्या २५० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळं सोमवारी (ता. २०) तणाव निर्माण झाला. गडचिरोली जिल्ह्यातील या घटनेनंतर संपूर्ण एटापल्ली तालुक्यात १५ दिवसांसाठी कलम १४४ लागू करण्यात आला आहे. आंदोलकांनी पोलिसांनाच घेरल्यानंतर आठ जणांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यामुळं गडचिरोलीतील आदिवासी नेते व पोलिसांमधील संघर्ष वाढतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एटापल्ली तालुक्यात होत असलेल्या लोहखाण प्रकल्प व सूरजागड प्रकल्पाला स्थानिक आदिवासी नेत्यांचा विरोध आहे. राज्य सरकार मूलभूत सुविधा देत नाही. उलट नेते केवळ खाणींना मंजूर देत आपला खिसा भरून घेत असल्याचा आरोप आहे. त्यामुळं महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेकडे जात असलेल्या गडचिरोली पोलिस व सी-६० कमांडो पथकाला आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी आदिवासींसह घेरलं व त्यांचा रस्ता रोखला. सोमवारी सकाळी ही घटना घडली. (Section 144 Imposed in Entire Etapalli Tehsil of Gadchiroli After Tribal Leader's Siege Police Force)

तोडगट्टा गावात घडलेल्या प्रकारानंतर गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिराली परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आदिवासी नेत्यांकडून पोलिसांवर आरोप होत आहेत. पोलिसांनी आदिवासींच्या झोपड्या तोडल्याचं सांगण्यात येत आहे. तालुक्यातील सुमारे ४० पेक्षा जास्त ग्रामसभेचे नेते आंदोलनात उतरले आहेत. शासनाच्या विरोधात हे आंदोलन असल्यानं माओवाद्यांकडून त्यांना फूस लावण्यात येत आहे.

पोलिसांसोबत सोमवारी घडलेल्या प्रकारानंतर एटापल्ली तालुक्यात माओवाद्यांकडून आदिवासींना पुढं करत हिंसक घटना घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं एटापल्ली तालुक्यात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. वांगेतुरी पोलिस स्टेशनचे सोमवारी उद्घाटन झाले. नेमका हा दिवस साधत पोलिसांना घेरण्याचा प्रकार झाल्यानं या भागात आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी वांगेतुरी, हेडरी, गट्टा जांबिया या भागासह संपूर्ण एटापल्ली तालुक्यात पुढील १५ दिवसांसाठी कलम १४४ लागू केलं.

एटापल्ली तालुक्यात माओवादी मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. त्यामुळं गडचिरोली पोलिसांनी महाराष्ट्रातून छत्तीसगडकडे जाणाऱ्या भागांमध्ये गस्त वाढवली आहे. आंदोलनकर्त्यांपैकी कोणते नेते व कार्यकर्ते माओवाद्यांच्या संपर्कात आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. मूळात आदिवासी ग्रामस्थ आंदोलनाच्या मनस्थितीत नाहीत, परंतु त्यांच्या गावातील नेत्यांना माओवादी चिथावणी देत आहेत. त्यामुळं हे नेते आदिवासी ग्रामस्थांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती करीत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.

फडणवीस यांना दिली माहिती

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. सोमवारी घडलेल्या प्रकाराची माहिती प्रशासनानं त्यांनादेखील यंत्रणेमार्फत दिल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT