MLA Nitin Deshmukh and MLA Deepak Kesarkar
MLA Nitin Deshmukh and MLA Deepak Kesarkar Sarkarnama
विदर्भ

भाजपला हिंदुत्वाची पार्टी म्हणून जन्म घालणारी शिवसेना, अन् ते मावळ्यांना झुकवायला निघाले !

जयेश गावंडे

अकोला : शेवटचं आवाहन करतोय, निर्णय घ्या, आम्ही सर्व विसरून जाऊ, आमचं तुमच्यावर प्रेम आहे, जनतेच्या निर्णयासोबत राहा, असं आवाहन दीपक केसरकरांनी शिवसेनेला केलं. या आवाहनानंतर अकोल्यातून शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं. छत्रपतींच्या मावळ्यांना झुकवण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख म्हणाले.

मुळात केसरकरांचं (Deepak Kesarkar) दुखणं वेगळं आहे. आमच्या खेड्यात एक म्हण आहे की, दुखते कुठे अन् शेकते कुठे. डोक्याला जखम अन् मांडीला मलम, असा प्रकार केसरकर करीत आहेत. त्यांची मुलाखत मी माध्यमांमध्ये बघितली. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) औरंगाबादला (Aurangabad) संभाजीनगर हे नाव द्यायला पाहिजे होतं, पण दिलं नाही. असेच काही आरोप त्यांनी केले. अडीच वर्षापूर्वी या महाराष्ट्रात फडणवीसांचे सरकार होते, त्यावेळी केसरकर गृहराज्यमंत्री होते. त्या काळात त्यांनी कधी तरी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना म्हटले का की, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा, असा प्रश्‍न आमदार देशमुख यांनी केला.

शिवसेनेच्या आणि राज्याच्या प्रमुखाबद्दल बोलणं आणि जनतेची दिशाभूल करणं आणि त्यांच्यासोबत जे शिवसेनेचे बंडखोर आमदार आहे, त्यांना हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे की, आमची बाजू मजबूत आहे. पण ते बंडखोरांचीही दिशाभूल करीत आहेत. केसरकरांना एक मुलगी आहे, तिचे नाव बदलले जाऊ शकते का, असा प्रश्‍न करीत तिचे नाव बदलायचे असेल तर पुनर्जन्म करावा लागेल आणि हे शक्य आहे का, असा प्रश्‍न करीत केसरकरांचा राजकारणातील बाप शिवसेना आहे, त्यांचे वडील बाळासाहेब आहेत, उद्धव ठाकरे आहेत आणि त्यांना बाप बदलायचा असेल, त्यांना राजीनामा द्यावा, जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवावी, असे आमदार देशमुख म्हणाले.

भाजपच्या आमदारांनी कधीच म्हटलं नाही की, युतीत लढताना शिवसेनेमुळे आम्हाला मते मिळाली. २० वर्षापूर्वी शिवसेनेच्या खांद्याला खांदा लाऊन जेव्हा हे भाजपवाले लढले आणि ग्रामीण भागात यांची गाडी जात होती, त्यावेळी लोक म्हणायचे की, व्यापाऱ्यांची पार्टी आली. भाजपला हिंदुत्वाची पार्टी म्हणून शिवसेनेने जन्माला घातले. पण आजपर्यंत भाजपच्या कुण्या आमदाराला असे नाही वाटले. शिवसेना युतीमुळे आपण निवडून येत गेलो, शिवसेनेने आपल्याला मोठे केले, त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर ते ईडीच्या कारवाया करत आहेत. हे करताना त्यांना लाज वाटली पाहिजे, असा घणाघाती आरोप आमदार देशमुख यांनी केला.

भाजपच्या एकाही आमदाराने आजपर्यंत म्हटले नाही की, देवेंद्रजी, शिवसेनेतले नेते आपले एकेकाळचे सहकारी आहेत, त्यांच्यावर अशा कारवाया करू नका. तुम्ही कारवाया थांबणार नाही, तर आम्ही भाजपमधून बाहेर पडतो, असे एकानेही हटले नाही. आता केसरकरांनी भाजप आमदारांचा आदर्श घेतला पाहिजे. मंत्रिमंडळात घेतलं नाही, हे केसरकरांचं दुखणं आहे आणि भाजपवाल्यांचे दुखणे काय आहे, तर महाराष्ट्राच्या सत्तेपासून त्यांना दूर ठेवले. त्यामुळे ते चवताळले आहेत आणि आता हे बंडखोर उद्धव ठाकरेंना झुकायला लावत आहेत. पण जिवाला जीव देणारे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत, हे बंडखोरांनी लक्षात घेतले पाहिजे, असे आमदार नितीन देशमुख म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT