Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Sarkarnama
विदर्भ

Sudhir Mungantiwar : 'गोवारी'चे राजकारण कुणी केलं नाही, पण खारघरच्या दुर्घटनेवर राजकारण होतंय !

सरकारनामा ब्यूरो

Sudhir Mungantiwar on Kharghar : खारघर येथे महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये १४ श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. कदाचित २ मे रोजी याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत दुर्दैवी घटनेचे राजकारण कुणीही करू नये, असे आवाहन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. (Has your party's funds dried up in the case of the Kharghar disaster?)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले, याचिकेचे स्वागत केले पाहिजे. अशा याचिकेच्या माध्यमातून कोण राजकारण करीत आहे? कोण सत्तेच्या स्वार्थापोटी अशा दुर्दैवी घटनेचे भांडवल करत आहे? मृत्यूचे राजकारण कशासाठी केले जात आहे, यावर या याचिकेच्या माध्यमातून चर्चा होईल, वादविवाद होतील, बाजू मांडल्या जातील. तेव्हा हे सर्व स्पष्टपणे समोर येईल. जेव्हा तुम्ही विधानपरिषद, विधानसभा सदस्य असता, तेव्हा तुम्हाला माहिती घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण कुठलीही माहिती न घेता केवळ राजकारण केले जात आहे.

महोत्सवस्थळी नियोजन काय होते, व्यवस्था काय होती, पुस्तिका कशी छापली गेली होती, श्री सदस्यांचा सहभाग काय होता ही माहिती न घेता केवळ आरोप केले जात आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, पत्नी श्री सदस्यांसोबत उन्हात बसले होते. तरीही विनाकारण दुर्दैवी घटनेचे राजकारण करायचे, हे योग्य नाही.

आतंकवादी घटनेच्या संदर्भात काही लोक जातात, त्यांच्या विधवेला १० लाख रूपयांची मदत करतात. एनकाऊंटर झाले म्हणून त्याच्या पत्नीला १० लाख रुपये देता. मग खारघर दुर्घटनेच्या बाबतीत तुमच्या पक्षाचा निधी आटला का, असा सवाल मुनगंटीवार यांनी कुणाचे (उद्धव ठाकरे) नाव न घेता केला.

दुर्दैवी घटना झाली, हे मान्य आहे. अतिरिक्त मुख्य सचिव त्याची चौकशी करीत आहेत. काही घटनांमध्ये कुणाचीही चूक नसते. उष्माघाताच्या संदर्भात काही योजना चुकल्या का, हे पाहता येईल. ७५च्या वर रुग्णवाहिका आणि औषधी तेथे उपलब्ध होत्या. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी स्वतः उन्हात बसल्या होत्या. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची आध्यात्मिक चुंबकीय शक्ती आहे. भरपूर काम त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे २० ते २५ लाख फॉलोअर्स आले. गाड्या पाठवून आणलेले ते लोक नव्हते.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितले होते की, सायंकाळी कार्यक्रम घेतल्यास लोकांची परत जाण्याची अडचण होईल, त्यामुळे दुपारची वेळ ठरवण्यात आली. त्यांनी जो भाव मांडला, की लोकांना वेळेत बाहेर जाता आले पाहिजे. त्याचा मान राखला गेला आणि दुर्घटनांची पूर्वमाहिती असली तर एकही अपघात घडला नसता. ही नैसर्गिक आपत्ती आहे. श्री सदस्यांसोबत चर्चा करून मुख्यमंत्री स्वतः चारदा तेथे गेले. सर्व सूक्ष्म व्यवस्था केली. तरीही दुर्दैवी घटना घडली, त्याला कोण काय करणार, असेही मुनगंटीवार म्हणाले.

इतकी प्रचंड उष्णता वाढेल, हा अंदाज कुणालाही आला नाही. ज्यांना उष्णतेचा त्रास झाला, त्यांच्याकडचे पाणी संपले होते, त्यांनी ते मागितले नाही. तेथे पाणी पोहोचवणारे लोक होते, तीन हजार नळ कनेक्शन होते. पण त्रास झाल्यावरही लोकांनी ते मिळवण्याचा प्रयत्नही केला नाही. उष्णता अंगावर घेऊन त्यांनी ते सहन केले. कारण त्यांना भाषण ऐकायचे होते. सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर काहींना प्रचंड त्रास झाला, ते सहन करू शकले नाहीत आणि ही दुर्घटना घडली.

माहिती नसताना लोकांमध्ये भ्रम निर्माण केला जात आहे. तुम्हाला आकडे माहिती नसतील तर तुमच्या कार्यकर्त्यांना पाठवून रुग्णालयांतून माहिती घेऊ शकता. आकडे माहिती आहेत, तर तुम्ही ते नावानिशी सांगा ना. १४ मृत्यू झाले, पण उपचार घेत असलेल्यांची संख्या सध्या निश्‍चित माहिती नाही. कारण काहींना १० मिनिटांत सुटी झाली, काहींवर दिवसभर उपचार करण्यात आले. जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) व्हायरल केलेला व्हिडिओ नाकारता येणार नाही. एखाद ठिकाणी चेंगराचेंगरीची घटना घडली असेल, पण सर्वदूर असे झाले नाही, असेही मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

११४ गोवारी गेले, तेव्हा आम्हीच काय कुणाही असं राजकारण (Political) केलं नाही. सर्व राजकीय नेते (Political Leaders) एकत्र राहिले. सत्तेची शिडी म्हणून त्या घटनेचा वापर केला नाही. पण आता तो प्रयत्न होतोय. जे फेक पत्र व्हायरल झालं, त्यामधून मते देऊ नका असे सांगण्यात आले. सामान्य व्यक्ती असं पत्र व्हायरल करणार नाही. त्यामागे नक्कीच कोणतीतरी शक्ती आहे, ती पोलिसांनी उघड केली पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT