Ashish Deshmukh on Nanar refinery project News, Samruddhi Mahamarg News
Ashish Deshmukh on Nanar refinery project News, Samruddhi Mahamarg News Sarkarnama
विदर्भ

समृद्धी महामार्गाने येऊ शकते क्रूड ऑईल आणि गोसेखुर्द पुरवेल पाणी…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : एके काळी कोकणातील नाणार येथे होणार असलेला रिफायनरी प्रकल्प आता राजापुरच्या बारसू येथे उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यावरून राजकारण तापत चालले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र दिले असल्याची माहिती आहे. कोकणात विरोध होत असेल तर हा प्रकल्प विदर्भात उभारावा, अशी मागणी विदर्भातील कॉंग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (Ashish Deshmukh on Nanar refinery project News)

रिफायनरी प्रकल्पासाठी अत्यावश्‍यक असलेले क्रूड ऑईल नागपूर (Nagpur) ते मुंबई (Mumbai) दरम्यान होत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या काठाने पाइपलाइनद्वारे आणले जाऊ शकते. पाण्याची गरज गोसेखुर्द सारख्या महाकाय प्रकल्पातून भागवली जाऊ शकते. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा प्रकल्प विदर्भात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे आणि विदर्भाच्या विकासाला चालना द्यावी, असे डॉ. देशमुख (Dr. Ashish Deshmukh) म्हणाले. या प्रकल्पाने विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असेही ते म्हणाले.

यासंदर्भात बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, ही मागणी नवीन नाही. २०१६-१७ मध्ये जेव्हा नाणारच्या स्थानिक लोकांनी तेथे येऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला. म्हणून शिवसेनेने तेव्हा प्रकल्पाला विरोध केला आणि तो प्रकल्प नाणारमध्ये होऊ नये, अशी उघड भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेव्हा घेतली. त्यावेळेसपासून मी त्यांच्या मागे लागलो आहे. महाराष्ट्रातून येवढा मोठा प्रकल्प इतरत्र जाऊ नये. कोकणातील लोकांना हा प्रकल्प तेथे नको असेल तर हा रिफायनरी प्रकल्प विदर्भात करा, असे मी त्यांना तेव्हापासून सांगत आलो आहे.

विदर्भात हा प्रकल्प झाल्यास विदर्भातील अर्थव्यवस्थेला बळकटी येऊ शकते. येथील हजारो तरुणांना या रिफायनरीच्या माध्यमातून रोजगार मिळू शकतो आणि आपल्या देशात हा इनलॅंड रिफायनरीचा हा काही पहिला प्रकल्प नाहीये. बहुतेक देशांमध्ये असे प्रकल्प इनलॅंड आहेत. समुद्राच्या काठावर असे प्रकल्प फक्त त्या देशांमध्येच होऊ शकतात, ही भावना चुकीची आहे. आपल्या देशातही भोपाळ, बिना, भटींडा, गुवाहाटी आदी ठिकाणी इनलॅंड रिफायनरी यशस्वीरीत्या चालत आहेत. त्या त्या ठिकाणी मोठे आर्थिक परिवर्तन झालेले पाहण्यात आले आहे. तसेच ते विदर्भातही होईल, असा विश्‍वास आशिष देशमुख यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT