<div class="paragraphs"><p>Sunil Kedar</p></div>

Sunil Kedar

 

Sarkarnama

विदर्भ

सुनील केदार म्हणाले, आता ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळण्याचा विषय गेल्या ४ वर्षांपासून रखडला होता. आज अखेर न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. न्यायालयाने महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांच्या आणि भूमिपुत्रांच्या मागणीवर एक सकारात्मक, सुखद निर्णय दिला, ही आनंदाची बाब आहे, असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) न्यायालयाच्या निकालानंतर म्हणाले.

मंत्री केदार म्हणाले, गेल्या ४ वर्षांपासून बैलगाडा शर्यतींवर निकाल लागत नव्हता. आमचे ॲडव्होकट जनरल कुंभकोणी यांनी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. काही तांत्रिक बाबींमध्ये हा निकाल अडलेला होता. आम्ही त्या तांत्रिक बाजू न्यायालयाला सांगण्यात यशस्वी ठरलो. गेल्या १५ दिवसांमध्ये आजची ही चौथी सुनावणी आहे. या निकालाने ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

बैलगाडा शर्यती तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश आधीपासून सुरू आहेत. पण महाराष्ट्रातच त्यावर निर्बंध लावण्यात आले. त्यावेळी तांत्रिक बाजू मांडण्यात कुठेतरी कमतरता राहिली होती, ती सर्व तांत्रिक बाजूंचा अभ्यास करून आम्ही भरून काढली. आम्ही न्यायालयाला सांगितले की, शर्यतींमध्ये खिल्लारी जातीची बैल धावतात. ही जाती दुधासाठी नाही, तर शर्यतींसाठी या बैलांचा उपयोग झालेला आहे. या बैलाकडे बघितल्यास लक्षात येते की, हरणापेक्षा हा बैल कमी सुंदर नाही आणि हरणापेक्षा याची धावण्याची गतीही कमी नाही. अशी ब्रीड आपण जोपासली पाहिजे, असे केदार म्हणाले.

खिल्लारी हे ब्रीड महाराष्ट्रातील आहे आणि याची मोठा बाजारपेठ आहे. इतर राज्यांमध्ये या ब्रिडला मोठी मागणी आहे. त्यासाठी मोठ्या रकमा मोजल्या जातात. या एका बैलाची किंमत ३ ते ४ लाख रुपयांपर्यंत असते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश आदी राज्यांतील लोक हे बैल महाराष्ट्रातून घेऊन जातात. देशभर या बैलाची मागणी असल्याचे त्याची जोपासना करणे गरजेचे आहे आणि न्यायालयाच्या आजच्या निकालाने याला चालना मिळाली असल्याचे केदार म्हणाले.

यामध्ये गवळासुद्धा आहे. राखी, गीर या जातींचाही समावेश आहे. या जाती शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देतील, तर शेतकरी त्याची जोपासना करतील, अन्यथा करणार नाही. कारण हल्ली बैलांच्या माध्यमातून शेती होत नाही, तर ट्रॅक्टर आणि इतर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे केली जाते. अशा वेळी बैलांच्या या प्रजाती जोपासायच्या असेल, तर त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैशांचे उत्पन्न झाले पाहिजे. बैलांच्या ज्या निरनिराळ्या जाती आहेत, त्या जोपासण्याचे काम पशुसंवर्धन विभागाकडून सुरू असल्याचेही मंत्री केदार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT