Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

‘केदारांनी अडवलेले ते ४५ लाख मिळाले नसते तर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली नसती’

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या माझ्या घराचे, शेतजमिनीचे ४५ लाख रुपये तत्कालीन ऊर्जा राज्यमंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी अडवून ठेवले होते. त्यानंतर पालकमंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांनी त्यात लक्ष घालून ते मला मिळवून दिले. कॅबिनेट मंत्र्यांनी सांगूनही कक्ष अधिकारी ऐकत नव्हता. त्यावेळी कॅबिनेट मंत्री असूनही एका कक्ष अधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये जाऊन माझं काम गडकरी यांनी करून दिलं होतं. ते मला आजही स्पष्टपणे आठवतंय. तेव्हा आपलं सरकार नसतं, गडकरी मंत्री नसते, तर मला माझ्या घराचे, शेतीचे पैसे मिळाले नसते आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली नसती, स्पष्ट कबुली भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. (Sunil Kedar withheld my Rs 45 lakh : Chandrashekhar Bawankule)

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बावनकुळे यांचा नागपुरात सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी केदार यांच्यावर हा गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, तत्कालीन एमएससीबीईने त्यावेळी आमची शेतजमीन, जागा संपादीत केली हेाती. मात्र त्याचा मोबदला दिला नव्हता. तो तब्बल ४५ लाख रुयपे होता. तत्कालीन राज्यमंत्री केदार यांनी तो अडवून ठेवला हेाता. गडकरींमुळे तो मला मिळाला. त्या ४५ लाख रुपयांमधून विकास सुरू झाला आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

अमरावतीला जात असताना दिल्लीहून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की,‘बावन्नकुळेजी, हम आपको पार्टीका अध्यक्ष बना रहे है.’ राष्ट्रीय अध्यक्षांकडून हे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला सांगणं, हे माझ्यासाठी मोठा क्षण होता. महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी, तसेच आपला पक्ष सर्व स्तरावर पोचवण्याची जबाबदारी आहे, अशी अपेक्षाही त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली. राज्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने मी तसा शब्द त्यांना दिला आहे. नेतृत्वाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. पक्षाच्या प्रतिमेला कुठलाही धक्का न लागता काम करणे ही माझी जबाबदारी आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

ते म्हणाले की, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे. गडकरी यांनी त्या चार वर्षांत भाजप सर्व स्तरावर पोचविण्याचे काम केले. भाजपचा राज्याचा अध्यक्ष काय होऊ शकतो, हे फडणवीसांनी दाखवून दिले आहे. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता उलथवून भाजपची सत्ता आणली. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी, प्रेरणा मला मिळणार आहे. या दोघांच्या संपूर्ण प्रवासाचा अभ्यास करून आपल्याला पुढे जायचे आहे. मी १९९२ पासून छत्रपती सेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करायचे. नितीन गडकरी त्यावेळी विधान परिषदेत होते. त्यावेळी त्यांनी एकदा मला घरी बोलावले आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

मी १९९५ मध्ये संघर्ष यात्रेदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. सन १९९५ ते ९७ च्या दरम्याना मी तालुका उपाध्यक्ष होता. नितीन गडकरी जेव्हा नागपूरचे पालकमंत्री होते, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, तुला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची आहे. मंत्री म्हणून गडकरी यांनी आमचे प्रकल्पग्रस्ताचे सर्व प्रश्न सोडवले. मलाही त्या काळात ४५ लाख रुपये मिळाले होते. त्यानंतर जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. त्यावेळी मला फडणवीस यांनी मदत केली, अशी कबुलीही त्यांनी दिली.

मला विधानसभेचे तिकिट मिळालं. मला वाटलं नव्हतं मी निवडून येईल म्हणून. पण (स्व.) मनोहर आक्रे यांनी जी मेहनत अगोदरच्या निवडणुकीत घेतली होती, त्याचा फायदा मला झाला आणि मी निवडून आलो. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत वाढत्या मताधिक्क्याने निवडून येत गेलो. मला सर्वात मोठी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. युवा मोर्चाचे प्रभारी म्हणून मी राज्यातील ३६ जिल्ह्यांत २५ लाख युवा योद्धे उभारण्याची संकल्प केला होता. तो येत्या २०२४ पर्यंत पूर्ण करायचा आहे, असा संकल्पही त्यांनी या वेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT