Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar Sarkarnama
विदर्भ

सरकारला हवी ‘ती’ जागा आणि डॉ. बाबासाहेबांच्या अमूल्य वस्तू; अनुयायांचा विरोध...

अतुल मेहेरे

नागपूर : नागपूर-काटोल (Nagpur) मार्गावरील चिचोली येथे शांतीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) ५०० पेक्षा जास्त वस्तू जपून ठेवण्यात आल्या आहेत. ही जमीन गोपिकाबाई बाजीराव ठाकरे यांनी १९५७मध्ये दान दिलेली आहे. राज्य शासनाने (State Government) येथे या वस्तूंचे संग्रहालय उभारण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यांपैकी ३२ कोटी रुपये दिले, पण उर्वरित निधी अडवून ठेवला आहे. निधीच्या बदल्यात शासनाला ती जागा आणि वस्तू हव्या आहेत. पण ही अट आंबेडकरी जनतेला मान्य नसल्याचे शांतीवनचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

डॉ. बाबासाहेबांच्या अमूल्य वस्तू खराब होऊ नये म्हणून त्यांवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. येथे ११.५ एकर जागेवर संग्रहालय प्रस्तावित आहे, पण राज्य सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे काम रखडले आहे. आज डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी तरी सरकारने हे काम मार्गी लावावे, अशी अनुयायांची मागणी असल्याचे संजय पाटील म्हणाले.

'माझा बुद्ध चालता फिरता आहे..'

डॉ. बाबासाहेबांच्या ज्या वस्तू आम्ही जतन करून ठेवल्या आहेत, त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. बाबासाहेब म्हातारे झाल्यावर त्यांना दात राहिले नव्हते, तर बत्तीसी लावलेली होती, ती बत्तीसीसुद्धा शांतीवनात आहे. बाबासाहेबांना गौतम बुद्धाची फोटो उघडे डोळे असलेली हवी होती, ती सुद्धा आहे. कारण बाबासाहेब नेहमी म्हणायचे की, माझा बुद्ध चालता फिरता आहे. उतारवयात बाबासाहेब चित्रकला शिकले. कावळा काढला, चिमणी काढली आणि एक दिवस भगवान गौतम बुद्धांचे चित्र काढले, ते चित्रसुद्धा शांतीवनात आहे, असे संजय पाटील म्हणाले.

बाबासाहेबांची टायपिंग मशीन..

२ वर्ष ११ महिने १८ दिवसांमध्ये या देशाचे संविधान त्यांनी ज्या टायपिंग मशीनवर तयार केले, ती टायपिंग मशीन, त्यांनी लिहिलेले बुद्ध आणि त्याचा धम्म हे स्क्रिप्ट, ज्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले, ती मूर्ती, हायकोर्टामध्ये जे ॲप्रॉन घालून जायचे, तो ॲप्रॉन, अशा ५००पेक्षा अधिक अत्यंत महत्वपूर्ण वस्तू शांतीवनामध्ये आहेत. बाबासाहेबांचा खासगी सचिव नानकचंदजी यांनी दिलेल्या आहेत. १९९१-९३ ला दिवंगत धम्मसेनानी वामनरावजी गोडबोले दिल्लीला गेले होते, तेव्हा त्यांनी या वस्तू तेथे बघितल्या आणि त्यांना ६ डिसेंबरच्या कार्यक्रमाला आमंत्रित केले होते. १९५६ ला गोडबोलेंनीच बाबासाहेबांना नागपूरला आणले होते. त्यावेळी नानकचंदजी त्यांच्या सोबत होते. नानकचंदजींनी १९५७-५८ पासून १९९३ पर्यंत त्या सर्व वस्तू आपल्याजवळ जपून ठेवल्या आणि त्यानंतर शांतीनवला दिल्या, असे पाटील म्हणाले.

गोपिकाबाईंनी दिली ११.५ एकर जमीन..

महाराष्ट्र शासनाने विदर्भ विकास पॅकेजच्या अंतर्गत ४० कोटी रुपयांचा निधी २०११ साली दिला. गोपिकाबाई बाजीराव ठाकरे यांनी ११.५ एकर जमीन १९५७ ला दान दिली होती, त्यापूर्वी १९५६ ला त्यांना धर्मांतर केले होते. त्याच जमिनीवर बाबासाहेबांच्या वस्तूंचे संग्रहालय उभारायचे आहे. पण शासनाचे म्हणणे आहे की, संग्रहालय उभारा आणि ते शासनाला हस्तांतरित करा. आम्ही काही त्या वस्तूंचे मालक नाही, पण इतक्या मौल्यवान वस्तू अशा कशा शासनाला द्यायच्या, असा सवाल पाटील यांनी केला. या कामासाठी शासनाने ४० कोटी रुपये द्यावे आणि ती जागा व वस्तू घेऊन टाकाव्या, हे योग्य नाही. आणि येवढ्या एका अटीसाठीच काही निधी शासनाने थांबवून ठेवला आहे. हा निधी शासनाने त्वरित देऊन हे काम मार्गी तात्काळ मार्गी लावावे, असे संजय पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT