MLA Ravi Rana
MLA Ravi Rana Sarkarnama
विदर्भ

अल्पसंख्याक समाजाचे नेते बाराही महिने इकडून तिकडे फिरत असतात…

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यांवरून राज्यातील वातावरण दिवसागणिक तापत आहे. त्यातच बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा वाचण्यासाठी जाणार असल्याचा इशारा दिल्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आमदार राणा उद्या मातोश्रीवर जाण्यासाठी अमरावतीतून निघणार असल्याची माहिती आहे. अशात त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या ३५ लोकांनी राजीनामा दिला.

राजीनामा सत्राबाबत बोलताना आमदार राणा (MLA Ravi Rana) म्हणाले, मी काहीही चुकीचे काम करत नाहीये. काही लोकांच्या सांगण्यावरून अमरावती जिल्ह्यात राजकीय खेळ सुरू झालेला आहे. पालकमंत्र्यांना (Guardian Minister) वाटत आहे की, अल्पसंख्याक वर्ग नाराज झाला, तर कॉंग्रेसकडे वळेल. पण असे काहीही होणार नाहीये. अल्पसंख्याक समाजाचे काही नेते बाराही महिने इकडून तिकडे फिरत असतात, असा गंभीर आरोप करीत ते म्हणाले, हेच लोक फक्त अशा गोष्टी करतात. सर्वसामान्य गरीब लोक युवा स्वाभिमान पक्षासोबत आहेत. त्यामुळे काही लोक गेले काय अन् राहिले काय, युवा स्वाभिमानला त्याचा काहीही फरक पडत नाही.

आमदार राणांनी ही भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या सांगण्यावरून हे राजीनामे देण्यात आले आहेत. त्यामुळे युवा स्वाभिमानला कुठलाही फरक पडणार नाही. मातोश्रीवर जाण्यापासून मला रोखण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. पण मी थांबणार नाही. मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी जाणारच आहे, असा निर्धार रवी राणा यांनी व्यक्त केला.

आम्हाला परवा नाही..

हनुमान जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचावी, अशी मागणी मी केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याचा विरोध केला. म्हणूनच आम्ही त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचायला जाणार आहो. आमच्या या निर्णयाच्या विरोधात ज्या कुणी लोकांनी राजीनामे दिले, त्याची परवा मी करणार नाही. आमच्या निर्धारावर आम्ही ठाम आहोत आणि मातोश्रीवर जाणार, हे नक्की आहे. महाराष्ट्राचे हित, सुरक्षा, विकास आणि मुख्यमंत्र्यांच्या मागे जे विघ्न लागले आहे, साडेसाती लागली आहे, त्यातून त्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी आम्ही मातोश्रीवर जाणार आहे, असे आमदार राणा म्हणाले.

कॉंग्रेसजवळ तिकीट देण्यासाठी उमेदवार नाहीत..

पालकमंत्र्यांना वाटते आहे की, युवा स्वाभिमानचे काही लोकांना राजीनामे दिले आणि कॉंग्रेसमध्ये आले तर कॉंग्रेसचा फायदा होईल, पण असे काहीही होणार नाहीये. आमच्या ३५ लोकांना पालकमंत्र्यांनी राजीनामा देण्यास बाध्य केले आहे. सद्यःस्थितीत कॉंग्रेसजवळ तिकीट देण्यासाठी उमेदवार नाहीत. जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका निवडणुकीत तिकीट कुणाला द्यावे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे उमेदवारीचा लालच देऊन इतर पक्षांतील लोकांना कॉंग्रेसमध्ये ओढण्याचा एककलमी कार्यक्रम पालकमंत्र्यांचा सुरू आहे, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT