Youth Protest at Ural-Zural Village. Sarkarnama
विदर्भ

Akola Politics : एकीकडे मोदींचा जयघोष, दुसरीकडे उरळ-झुरळच्या ग्रामस्थांचा विरोध

जयेश विनायकराव गावंडे

Vikasit Bharat Sankalp Yatra : केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. सोमवारी (ता. 22) एकीकडे श्रीराम नामाचा आणि ‘मोदी.. मोदी..’चा जयघोष सुरू असताना ‘मोदी सरकार’ या नावाला विरोध व्यक्त करीत अकोला येथील उरळ-झुरळच्या ग्रामस्थांकडून यात्रेचा रथ रोकण्यात आला.

विकसित भारत राज्यातील गावागावात हा रथ फिरत आहे. या रथावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आणि फोटो लावण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या उरळ-झुरळ या गावात संकल्प यात्रा पोहोचली. ग्रामस्थांनी मोदी सरकार या नावावर आक्षेप घेतला. पहिल्यांदा मोदी सरकार खोडा अन् मगच गावात योजनाची माहिती सांगायला या, अशी भूमिका गावातील काही लोकांनी घेतली.

ग्रामस्थांची अधिकाऱ्यांसोबत काही वेळ शाब्दिक चकमक झाली. यावेळी रथाला काळे झेंडे दाखवत ‘मोदी सरकार गो बॅक’चे नारेही लावण्यात आले. पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे, केंद्र सरकारने केलेली कामे यांची माहिती देण्यासाठी राज्यभरात फिरणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेला अकोल्यात दुसऱ्यांदा व विदर्भात तिसऱ्यांदा रोकण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून यात्रेत ‘मोदी सरकार विरोध’ या नावाला विरोध होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागातील नागरिकांना भारत सरकारच्या योजनांची माहिती व्हावी, त्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू केली आहे. मात्र या यात्रेला अनेक ठिकाणी विरोध होत आहे. हा विरोध आहे ‘मोदी सरकार’ या नावाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रथावर ‘मोदी सरकार’ ऐवजी ‘भारत सरकार’ लिहा, अशी मागणी अनेक गावांत करण्यात येत आहे. विरोध करणाऱ्यांमध्ये काही राजकीय पक्षाचा पदाधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ आणि झुरळ या गावात सोमवारी (ता. 22) ही यात्रा पोहचली. यावेळी शेतकरी गोपाल पोहरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक पोहरे, प्रवीण माळी यांच्या सह गावकऱ्यांनी या रथाला काळे झेंडे दाखविले.

योजना भारत सरकारच्या आहेत की, मोदी सरकारच्या, असे म्हणत हे गावकऱ्यांनी हा विरोध केल्याचे समोर आले आहे. या रथाला आमचा विरोध नाही मात्र या रथावर मोदी सरकार ऐवजी भारत सरकार लिहायचे होते. अशी गावकऱ्यांनी यावेळी मागणी केली आहे. यावेळी ‘मोदी सरकार गो बॅक’चे नारे लावत विरोध दर्शविला. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. उरळ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

यापूर्वी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातीलच रिधोरा येथेही या रथाला विरोध करण्यात आला होता. आता पुन्हा या यात्रेला विरोध होताना दिसत आहे. सरकारी पैशांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार केला जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. या रथावर नरेंद्र मोदी यांचे मोठे पोस्टर आणि ‘मोदी सरकारची हमी’ असे ठळक वाक्य लिहिले आहे. याशिवाय देशभरातील सरकारी यंत्रणांचाही या यात्रेच्या नियोजनासाठी वापर होत आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

काही ठिकाणी, सिलिंडरचे भाव वाढले, शेतमालाला भाव मिळाला नाही यावरुन देखील विरोध होताना दिसत आहे. आमचे म्हणणे तुम्हीच सरकारपर्यंत पोहोचवा, असे गावकरी या विरोधावेळी म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे या रथाला प्रतिसाद कमी आणि विरोधच जास्त मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT