Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Wadettiwar On Government : वाॅशिंग मशीनमध्ये टाकूनही डाग गेले नाहीत; नऊ मंत्र्यांना काढावं लागणार, वडेट्टीवारांचे भाकीत !

नऊ मंत्र्यांची नावे सध्या सांगू शकत नाही, मात्र हे नऊ मंत्री या मंत्रिमंडळात राहणार नाहीत, हे निश्‍चित.

Atul Mehere

Nagpur Political News : हसन मुश्रीफ यांच्यावर पीएमएल कोर्टाने गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदवले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, हे स्पष्ट झालंय. सरकारकडे थोडीतरी इमानदारी असेल, तर हसन मुश्रीफ यांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करावी. पुढच्या दहा, बारा दिवसांत ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, अशा नऊ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढावेच लागेल, असे भाकीत काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वर्तवले. (The names of the nine ministers cannot be mentioned right now)

आज (ता. सात) नागपुरात वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गंभीर आरोप असताना काही मंत्र्यांनी गोमूत्र शिंपडून, त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकूनसुद्धा त्यांच्यावरील डाग गेलेले नाहीत. 'ये दाग जरा जिद्दी हैं, वो निकलतेही नहीं', अशी परिस्थिती या नऊ मंत्र्यांची झालेली आहे. या नऊ मंत्र्यांची नावे सध्याच सांगू शकत नाही, मात्र हे नऊ मंत्री या मंत्रिमंडळात राहणार नाहीत, हे निश्‍चित.

या सर्वांवर आम्ही आरोप लावलेले नाहीत, तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारी व आरोप आहेत. त्या तक्रारीनंतरच यांची चौकशी करून ईडीने नोटीस बजावली आहे, असे त्यांनी नमूद केले. सध्या जागावाटपाचं सत्र दिल्लीमध्ये ठरत आहे. प्रदेशाध्यक्षांकडून विभागीय कार्यकर्त्यांच्या बैठकीचं सत्र कोकणपासून सुरू झालं आहे.

नागपूरला १२ ऑक्टोबरला या संदर्भात बैठक होणार आहे. राहुल गांधींना बदनाम करण्याचा डाव रचला जातोय. त्यामुळे कालची (ता. सहा) बैठक सकारात्मक आणि 'इंडिया'ला मजबुती देणारी बैठक होती. जागावाटपाच्या संदर्भाने आम्ही पुढे चाललोय, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

आरोग्य यंत्रणा नव्हे, सरकार जबाबदार...

राज्यातील रुग्णांच्या मृत्यूबाबत रुग्णालयांचा दोष नसून सरकारचा दोष आहे. त्यामुळे खुनाचा गुन्हा सरकारवर नोंदवला गेला पाहिजे. तीन-तीन वेळा स्वच्छतेचे टेंडर काढल्यावरदेखील टेंडर पास करत नाही. ४० टक्क्यांच्यावर स्वच्छता कामगार नाहीत, निधी उपलब्ध नाही, रुग्णांना उपचार आणि औषधे वेळेवर मिळू शकली नाहीत. यामध्ये दोष कुणाचा आहे. त्याकरिता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सरकारवर दाखल केला पाहिजे, हे आमचे स्पष्ट मत आहे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT