Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
विदर्भ

Bharat Jodo : विस्कटलेले दलित, मुस्लीम, आदिवासी आणि ओबीसी ही यात्रा जोडेल का?

अतुल मेहेरे

नागपूर : गेल्या १०-१२ वर्षांत कॉंग्रेसची वोट बॅंक विस्कळीत झाली होती. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेने ही बॅंक परत आणण्याचा प्रयत्न केला आहे. २०२४ मध्ये आमच्याशिवाय पर्यायच नाही, असे काही भाजप नेत्यांना वाटत आहे. परंतु त्यांनी तसे समजण्याचे कारण नाही. कारण दुरावलेले लोक जवळ आणण्याचे काम यात्रेने बऱ्यापैकी केले. पण आता जवळ आलेले दलित, मुस्लीम, आदिवासी, ओबीसी पुढील काळात टिकतील का, हा खरा प्रश्‍न आहे.

कॉंग्रेसची (Congress) दलित, मुस्लीम, आदिवासी आणि ओबीसी (OBC) ही वोट बॅंक विस्कळीत झाली होती. काही भाजप, (BJP) काही वंचित बहुजन आघाडी, काही एमआयएम, तर काही लोक आठवले गटात विखुरले गेले होते. ते परत ओढण्याचे काम या यात्रेने केले. मल्लिकार्जुन खरगेंनी जवळीक साधण्याचा पूर्ण केला. खरगे कर्नाटकमधील मोठे दलित व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांना या यात्रेच्या माध्यमातून कॅच केले आहे.

नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, बुलढाणा कॉंग्रेसचा पट्टा आहे. आदिवासी भाग आहे. मागासलेले जिल्हे आहेत. मराठवाडा आणि विदर्भ कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. तो आता राहिलेला नाही. राष्ट्रवादीने इकडे लक्ष दिलेले नाही. शिवसेना आणि कॉंग्रेसचे मराठवाड्यात चांगले प्राबल्य आहे. तर विदर्भात भाजप आणि कॉंग्रेसचा जनाधार चांगला आहे. पंढरपूरची पोटनिवडणूक भाजपने जिंकली होती. तर देगलूरमध्ये विधानसभा निवडणुकीत रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. कोरोनाच्या काळात त्यांचे निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक झाली. हा अशोक चव्हाणांसाठी महत्वाचा विषय होता आणि येथून जितेश अंतापूकर एससी राखीव मतदारसंघातून निवडून आले. सुहास साबणे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आणि भाजपकडून उभे राहिले आणि त्यांचा पराभव झाला. त्यामुळे देगलूर हे कॉंग्रेससाठी महत्वाचे ठरले.

...म्हणून निवडले देगलूर !

कर्नाटकातून महाराष्ट्रात येताना राहुल गांधींनी त्यामुळेच देगलूरची निवड केली. नांदेड आणि हिंगोलीमध्ये कॉंग्रेसचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. सातव परिवार आणि अशोक चव्हाण यांचे हिंगोलित प्राबल्य आहे. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना कॉंग्रेसने विधान परिषदेवर घेतले. राजीव सातव यांची जागा बिडला रजनी पाटील यांना देऊन कॉंग्रेसने बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. यात्रेदरम्यान अमित आणि धिरज देशमुखांना हिंगोलीला बोलावून घेतले आणि जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली. कोल्हापूरचे सतेज पाटील नांदेडपासून यात्रेसोबत होते. विश्‍वजित कदम, विनायक निम्हण, भाई जगताप, संजय निरूपम, मोहन जोशी, नसीम खान हेसुद्धा होते.

भाषणात सकारात्मक बदल..

माजी मंत्री यशोमती ठाकूर नांदेडपासून होत्या. राज्यसभेचा महाराष्ट्राचा खासदार इम्रान प्रतापगडी कन्याकुमारीपासून होते. टीमवर्क चांगले ठेवले. इमेज बिल्डिंग करण्याचे काम केले. मिडियावर जास्त भर न देता, सोशल मिडियावर जास्त भर दिला. भाजपकडून चांगल्या गोष्टी कॉंग्रेसने शिकून घेतल्या असे म्हटल्यास वावगे होणार नाही. राहुल गांधींच्या भाषणात खूप चांगले बदल झालेले पाहायला मिळाले. जयराम रमेश, मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह या ज्येष्ठ नेत्यांनी सर्वव्यापी नियोजन केले. जिथून जिथून यात्रा गेली, तेथून हवा निर्माण केली. भविष्यातील आशेचा किरण तयार झाला. पुन्हा एका कॉंग्रेसला स्थान दिले पाहिजे, असे मत तयार झाले आहे. मरगळ आली होती, ती झटकली गेली.

सम्राट अशोक विरोधकांवर जसे तुटून पडायचे, शक्ती संपवून टाकायचे. तशीच भाजपने कॉंग्रेसची शक्ती संपवून टाकली होती. दिसेल त्याला टारगेट केले आणि जो येईल त्याला पक्षात घेतले आणि कॉंग्रेस संपवूनच टाकली. त्याचा परिणाम कॉंग्रेसवर चांगलाच झाला. सुरुवातीला परिणाम जाणवला नाही, पण नंतर जाणवले. भाजपने बाहेरच्यांची थप्पीच लावली होती. फ्लोटींग वोट्स (तरंगती मते) जास्त असतात. बटन दाबेपर्यंत त्यालाही माहिती नसतं. अशा मतदारांची संख्या कमी झाली पाहिजे. कारण समोर ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यावर यात्रेचा परिणाम होऊ शकतो. मतदार आता विचार करेल, की माझा माणूस कोण आहे. ग्रामपंचायत निवडणुका कॉंग्रेससाठी लिटमस टेस्ट असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT