Sunil Kedar On ZP Nagpur
Sunil Kedar On ZP Nagpur 
विदर्भ

सुनील केदार गट वगळता सर्वांचा अर्थसंकल्पास विरोध, राष्ट्रवादीने कॉंग्रेसला सोडले वाऱ्यावर...

निलेश डोये

नागपूर : वित्त सभापती भारती पाटील यांनी काल जिल्हा परिषदेचा (ZP) ३८ कोटी ६० लाखांचा अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे विरोधकांबरोबर सत्ताधाऱ्यांनीही प्रचंड विरोध केला. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या गोंधळातच वित्त सभापतींनी अर्थसंकल्प मांडला. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या गटाचा अपवाद वगळता सर्वांनीच यास विरोध दर्शवला. अर्थसंकल्पावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये वाकयुद्ध सुरू होते. परंतु राष्ट्रवादीच्या एकाही पक्षाने यावर मत मांडले नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला एकटे सोडल्याचे दिसत होते.

अर्थसंकल्पात १७ सामूहिक निधीला कात्री लावली. याचा विरोध सत्ताधारी सदस्य नाना कंभाले यांनी केला. ते केदारविरोधी (Sunil Kedar) गटाचे आहेत. कात्री लावलेला निधी कुठल्या विभागाकडे निधी वळता केला, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. विरोधी पक्ष नेते आतिश उमरेसह महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष शिवसेनेचे संजय झाडे, व्यंकट कारेमारे, कैलास बरबटे, सतीश डोंगरे, सुभाष गुजरकर यांनीही विरोध दर्शवला. माजी मंत्री मुळक (Rajendra Mulak) गटाचे अरुण हटवार यांनीसुद्धा निधीला कात्री लावल्याने नाराजी दर्शवली. त्यामुळे वित्त सभापती भारती पाटील यांनासुद्धा समर्पक उत्तर देता आले नाही.

सत्तापक्ष नेत्या अवंतिका लेकुरवाळे, प्रकाश खापरे व दुधाराम सव्वालाखे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. यावर तोगडा काढण्यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागाला निधी वाढवून देण्याचा ठराव घेण्याची मागणी पुढे रेटण्यात आली. अर्थसंकल्पात असलेल्या त्रुटी दूर केल्या जातील, सर्वांच्या सूचना व सुधारणेसह अर्थसंकल्प मंजूर करण्याची विनंती केली. या गोंधळातच अध्यक्ष बर्वे यांनी अर्थसंकल्प मंजूर झाल्याचे जाहीर केले.

अर्थसंकल्प तयार करण्याचे अधिकार वित्त समितीला आहे. हा समितीत ठरल्यानुसार अर्थसंकल्प नाही. कृषी व पशुसंवर्धनासह काही विभागाला कात्री लावण्यात आली. वित्त अधिकाऱ्याची तक्रार सीईओंकडे करू.

नाना कंभाले.

वित्त समितीत चर्चा झाली होती. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व विभागप्रमुखांशी चर्चा करून तो अंतिम करण्याचे ठरले होते. नाना कंभाले यांना माहिती देण्यात आली होती. कंभाले दिशाभूल करीत आहेत.

भारती पाटील, वित्त समिती सभापती.

शेतकऱ्यांवर अन्याय करणारा अर्थसंकल्प आहे. चर्चा न करताच मंजुरी देऊन हा अर्थसंकल्प फक्त आपल्या फायद्यासाठी तयार केला हे त्यांनी दाखवून दिले.

आतिश उमरे, विरोध पक्ष नेते.

अध्यक्ष म्हणाल्या, मी फॉरेनमधून आली नाही..

अर्थसंकल्प शेतकरीहिताचा नसल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर ‘मी सुध्दा शेतकऱ्यांची मुलगी आहे. मी फॉरेनमधून आलेली नाही’ असे प्रत्युत्तर रश्मी बर्वे यांनी दिले.

राष्ट्रवादीचे तोंडावर बोट

अर्थसंकल्पावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये वाकयुद्ध सुरू होते. परंतु राष्ट्रवादीच्या एकाही पक्षाने यावर मत मांडले नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला एकटे सोडल्याचे दिसत होते.

वरिष्ठ सदस्यांचे मौन

काँग्रेसमधील वरिष्ठ सदस्य गप्प बसले होते. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली नाही. विशेष म्हणजे मागील सभेत आक्रमक असलेल्या कुंदा राऊत व शांता कुमरे यावेळी शांत होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT