Bachchu Kadu, Yashomati Thakur, Ajit Pawar and Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

Yashomati Thakur : बच्चू कडू त्यांच्यासोबत आहेत, त्यांना ‘अंदर की बात’ माहिती असेल !

Amar Ghatare

Yashomati Thakur : महायुतीसोबत जाऊन अजित पवार उपमुख्यमंत्री तर झाले, पण लोकसभा निवडणुकीत त्यांना अत्यंत कमी जागांवर समाधान मानावे लागणार, अशी स्थिती आहे. अशातच प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी त्यांना भाजपच्या तिकिटावर लढावं लागेल, असं वक्तव्य केलं. त्यावर आज माजी मंत्री, आमदार यशोमती ठाकूर यांनी भाष्य केलं.

आज (ता. 8) अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, अजित पवार आणि बच्चू कडू यांना त्यांची मजबुरी माहिती असेल. कुणाची काय लाचारी आहे, हे तर बच्चू कडू यांना चांगल्या प्रकारे माहिती असेल. कारण ते महायुतीच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांना अंतर्गत माहिती असेल कदाचित. त्यामुळेच अजित पवार व शिंदे गटाचे लोक कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

अजित पवार कोणत्या स्थितीत आहेत, हेसुद्धा तेच जाणू शकतात. कारण देशातील लोकशाही संपवण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. भाजपला वन नेशन वन पार्टी करायचे आहे. त्यासाठी सगळ्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे. ब्लॅकमेलिंग आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून, दादागिरी अरेरावी करून लोकशाही संपवण्याचे काम भाजप करत असल्याचा घणाघात यशोमती ठाकूर यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जागावाटपावरही यशोमती ठाकूर यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, जागावाटपाचे गुऱ्हाळ जास्त लांबवण्यात अर्थ नाही. जागावाटपाचा तिढा जास्त काळ राहिल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे जो-जो संविधानात विश्वास ठेवत, ज्याला-ज्याला असं वाटतं की लोकशाही टिकली पाहिजे, तो हा तिढा लवकर संपवेल. संविधान आणि लोकशाही हे या देशाचा आत्मा आहेत आणि या देशाचा आत्मा दुखावण्याचे काम करण्याची कुणीही प्रयत्न करू नये.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे परफॉर्मर नेते नितीन गडकरी यांचे नाव भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये नाही. यावरून गडकरींनी आजवर ब्र शब्ददेखील काढला नाही, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यासंदर्भात यशोमती ठाकूर म्हणाल्या, दिल्लीवाले महाराष्ट्राला दुय्यम समजतात. म्हणून महाराष्ट्राकडे सातत्याने त्यांचे दुर्लक्ष होते. महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडण्याचं काम झालं आहे. आणि ते केंद्रात सत्तेत असलेल्या लोकांनी केले आहे. त्यांना हे वातावरण जास्त बिघडवायचे असेल म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील उमेदवार अद्याप घोषित केले नसावे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचे दर 100 रुपयांनी कमी केले. याबद्दल विचारले असता, हा चुनावी जुमला आहे. खरंच जर महिलांचं हित त्यांच्या मनामध्ये असतं, तर पंतप्रधान मणिपूरलादेखील जाऊन आले असते. तिथं महिलांचा काय छळ झाला, तेसुद्धा बघून आले असते, पण त्यांना त्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. त्यांना केवळ चुनावी जुमल्यांमध्ये इंटरेस्ट आहे, असा घणाघाती आरोप आमदार ठाकूर यांनी केला.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT