Yashomati Thakur. Sarkarnama
विदर्भ

Ashok Chavhan Resignation : चव्हाणांनंतर यशोमती ठाकूरांनी ठरविले की...

Amar Ghatare

Maharashtra Politics : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे 10 ते 15 आमदार संपर्कात असल्याचा दावा बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.

राणा यांनी दावा करताना अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचेही नाव घेतले आहे. राणांच्या या वक्तव्याला ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अशोक चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला ‘ब्लॅकमेलिंग‘ करून भाजपने फोडले आहे. मात्र, भाजपने कितीही प्रयत्न केले, दबाव टाकत नेत्यांना ओढण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता भाजप आणि अशा गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चितच थारा देणार नाही, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. आपण आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्षासोबत व त्यांच्या विचारधारेसोबत राहणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी ठामपणे नमूद केले.

केंद्र सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचे नाव आले होते. या श्वेतपत्रिकेनंतर चव्हाण यांनी दिलेला राजीनामा कशाचे लक्षण आहे, हे स्पष्ट होते. अशोक चव्हाण यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दबाव होता. मात्र, अखेरीस त्यांना भाजपने ‘ब्लॅकमेल’ करून राजीनामा द्यायला भाग पाडले आहे. आपल्या स्वतःच्या पक्षाची ताकद आणि प्रतिमा दोन्ही उतरणीला लागल्यामुळे भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचे डाव खेळत आहेत. काही समस्यांमध्ये अथवा प्रकरणांमध्ये अडकलेल्या काही ‘आदर्श’ नेत्यांना भारतीय जनता पार्टी निश्चितच दबाव टाकत आपल्याकडे यायला भाग पाडत आहे. त्यासाठी ईडी, सीबीआय, आयकर या यंत्रणांची भीती दाखवून पक्षात येण्यास बाध्य करू शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे हे दबावतंत्र जनता पाहत आहे. जनतेला हा प्रकार नक्कीच रुचणार नाही. अत्यंत विकृत पद्धतीच्या या राजकारणाचा शेवट येत्या निवडणुकीत सूज्ञ मतदारांकडून निश्चितच केला जाईल, याची खात्री असल्याचे ठाकूर म्हणाल्या. यापूर्वीही मुघल सेना प्रचंड फौजफाटा आणि दारूगोळा घेऊन मावळ्यांवर चाल करून यायची. आमिष दाखवून आणि भीती दाखवून काही मनसबदारांना आणि वतनदारांना मुघलांनी आपल्या बाजूने करून घेतले होते, असे ठाकूर म्हणाल्या.

देशासाठी, स्वराज्यासाठी लढणाऱ्या, मातीशी इमान बाळगलेल्या, संख्येने कमी असलेल्या मावळ्यांचा विजय छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली झाला. हा विजय महाराष्ट्र विसरलेला नाही. आगामी निवडणुकीत हा इतिहास महाराष्ट्रातील जनता विसरणारही नाही. विकृत राजकारणाला आणि गद्दार युतीला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही, जनता थारा देणार नाही, असेही ठाकूर म्हणाल्या.

Edited By : Prasannaa Jakate

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT